सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने तिसऱ्या टी20 मध्ये बांग्लादेशचा केवळ 133 धावांनी पराभवच केला नाही, तर एका वर्षात सर्वाधिक टी20 सामने जिंकण्याच्या यादीत पाकिस्तानलाही मागे टाकले. क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा 2024 मधील हा 21 वा विजय आहे. तर 2021 मध्ये पाकिस्तानने 20 सामने जिंकले होते. या यादीत भारताने दुसऱ्यांदा पाकिस्तानला मागे टाकले आहे. टीम इंडियाने यापूर्वी 2022 मध्ये 28 टी20 सामने जिंकले आहेत. एका वर्षात सर्वाधिक टी20 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम युगांडाच्या नावावर आहे. ज्यांनी 2023 मध्ये 29 सामने जिंकले होते.
या वर्षी युगांडाचा विश्वविक्रम मोडणे भारतासाठी कठीण दिसते कारण भारताकडे फारसे सामने शिल्लक नाहीत. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वर्षातील शेवटची टी20 मालिका खेळणार आहे.
भारताला 7 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. जर टीम इंडिया हे सर्व सामने जिंकण्यात यशस्वी ठरली. तरी पण टीम इंडिया 2024 मध्ये केवळ 25 विजयांचा टप्पा गाठू शकेल. 2024 मध्ये भारताची विजयाची टक्केवारी 95.45 आहे. जी एका कॅलेंडर वर्षात किमान 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या संघासाठी आतापर्यंतची सर्वोत्तम आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास संजू सॅमसनच्या झंझावाती शतकाच्या जोरावर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 297 धावा केल्या. टी20 क्रिकेटच्या इतिहासातील ही भारताची सर्वात मोठी धावसंख्या आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 164 धावाच करू शकला. आशाप्रकारे भारताने हा सामना 133 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला आणि मालिका 3-0 ने जिंकली. हार्दिक पांड्याला मालिकावीर म्हणून गाैरवण्यात आले.
हेही वाचा-
टीम इंडियाची हैदराबादमध्ये रेकाॅर्डतोड कामगिरी; बांग्लादेशच्या बत्या गुल..!
IND vs BAN; तिसऱ्या सामन्यात का झाले नाही ‘या’ खेळाडूचे पदार्पण? KKR खूश कारण काय?
सूर्याचे टी20 मध्ये 2500 धावा पूर्ण, कोहलीनंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा