मेरठच्या क्रिकेट अकादमीत उत्तर प्रदेश रणजी संघाचा सराव चालू होता. भुवनेश्वर कुमार, सुरेश रैना यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडू सोबतच रणजी संघातील प्रस्थापित खेळाडू तसेच काही वयोगट स्पर्धा खेळणारे खेळाडू सुद्धा मैदानावर होते. भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज असलेल्या भुवनेश्वर कुमारला एक पंधरा वर्षाचा फलंदाज फ्रंटफुटला येऊन खेळत होता. काही सुंदर कव्हर ड्राईव्ह, काही स्ट्रेट ड्राईव्ह आणि काही फटके तर सरळ भुवनेश्वरच्या डोक्यावरून मारत होता. सर्व खेळाडू सराव सोडून या दोघांमधील जुगलबंदी पाहत होते. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी भुवनेश्वर कुमारला समर्थपणे तोंड देणाऱ्या खेळाडूचे नाव होते प्रियम गर्ग.
पूजा, ज्योती, रेशू व शिवम या चार अपत्यानंतर कुसुमदेवी व नरेश कुमार या दाम्पत्याच्या घरी ३० नोव्हेंबर २००० रोजी प्रियमचा जन्म झाला. इतर भावंडे अभ्यासात हुशार होती पण लहानगा प्रियम खेळात सर्वात पुढे असायचा. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. नरेश कुमार मिळेल ते काम करत आपल्या कुटुंबाचे पोट भरत.
प्रियम आपल्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळत असत. घरात टीव्ही नसल्याने तो गल्लीतच एका पान टपरीवर सामने पाहायचा. एकदा त्याच्या एका नातेवाईकाने त्याची फलंदाजी पाहिली आणि नरेश यांना त्याला क्रिकेट अकादमीत पाठवण्याविषयी बोलले. आर्थिक परिस्थिती नसतानाही, केवळ प्रियमच्या क्रिकेट बद्दलच्या प्रेमामुळे नरेश यांनी त्याला मेरठच्या क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेऊन दिला. किला परिक्षितगड या आपल्या गावापासून ते प्रियमला रोज मेरठला नेण्या-आणण्याचे काम करत. अशातच, गर्ग कुटुंबावर कधीही भरपाई होऊ शकणार नाही असा आघात २०११ मध्ये झाला. काविळीच्या आजाराने प्रियमच्या आईचे निधन झाले. तेव्हा प्रियम अवघा ११ वर्षाचा होता. त्याचवेळी, प्रियमचे प्रशिक्षणही थांबवण्यात आले.
आईच्या जाण्याने पाचही भावंडे खूप दुःखी होती. अशावेळी, नरेश यांनी आपल्या मुलांना आई-वडील या दोघांचेही प्रेम दिले. प्रियम चांगला खेळतो हे समजल्यामुळे नरेश यांनी त्याला पुन्हा अकादमीत पाठवण्यास सुरुवात केली. नरेश हे सकाळी सायकलवरून दूध टाकायचे काम करत तर दिवसभर टॅक्सी चालवत. आपल्या मुलांना काहीही कमी पडू नये याची ते काळजी घेत.
इकडे, एका वर्षात प्रियमची निवड उत्तर प्रदेशच्या चौदा वर्षाखालील संघात झाली. त्याने दोन द्विशतकी खेळ्या करत सर्वांची वाहवा मिळवली. दोन वर्षातच त्याला सोळा वर्षाखालील संघात देखील संधी देण्यात आले. या वेळी सुद्धा त्याने पुन्हा दोन द्विशतके झळकावली. या सर्वांमध्ये त्याचे प्रशिक्षक संजय रस्तोगी व मेरठ जिल्हा क्रिकेट संघटनेचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
२०१८ मध्ये दुखापतीमुळे त्याची भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली नाही. मात्र त्याच वर्षी त्याला उत्तर प्रदेश रणजी संघात स्थान मिळाले. पहिल्याच वर्षी ८०० धावा काढत तो वरिष्ठ स्तरावर प्रकाशझोतात आला. त्याच्या, खेळी विणण्याच्या तसेच समजदारीपूर्ण फलंदाजीचा राहुल द्रविड प्रशंसक झाला.
आतापर्यंत, फक्त १२ प्रथमश्रेणी सामन्यात ८६७ तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५७० धावा काढत त्याने २०१८-१९ चा देशांतर्गत क्रिकेट हंगाम गाजवला. त्याच्या नावे दोन शतकांसह एक द्विशतकही आहे.
डिसेंबर २०१९ त्याच्यासाठी अनेक आनंदाच्या बातमी घेऊन आला. २०२० मध्ये होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली तर पुढच्याच आठवड्यात २०२० आयपीएलसाठी सनरायझर्स हैदराबाद संघाने एक कोटी नव्वद लाखांची बोली लावून त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.
जानेवारी २०२० मध्ये द. आफ्रिकेत झालेल्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात प्रियमच्या नेतृत्वात भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम फेरीत उलटफेर झाल्याने बांगलादेशने भारताला पराभूत करत आपले पहिले विजेतेपद मिळवले. मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद व पृथ्वी शॉ यांच्यानंतर भारताला युवा विश्वचषक मिळवून देण्यात तो थोडक्यात अपयशी ठरला.
युएईमध्ये आयपीएलचा तेरावा हंगाम १९ सप्टेबर पासून सुरू होत आहे. तेव्हा, प्रियम डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, राशिद खान, भुवनेश्वर कुमार या दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करताना दिसेल.
वाचा-
-गोलंदाजी, फलंदाजी, म्हणाल तिथे क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षणसुद्धा करणारा खराखुरा ऑलराऊंडर
-…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला
-तमिळनाडूचा मेकॅनिकल इंजिनीयर आयपीएलमध्ये करोडपती होतो तेव्हा…