आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (८ सप्टेंबर) आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यामध्ये बीसीसीआयने अनेक काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या रवीचंद्रन अश्विनला संधी दिली. तसेच अनेक युवा खेळाडूंना देखील संघात सामील करण्यात आले आहे. तर या दरम्यान असेही काही खेळाडू आहेत, ज्यांची निवड होणे अपेक्षित होते, मात्र तरीही बीसीसीआयने त्यांना डच्चू दिला.
ज्यानंतर बीसीसीआयच्या या निर्णयावर सोशल मीडियावर चांगलीच टीका करण्यात आली होती. तर आज आपण अशाच ३ खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना न निवडणे कदाचित भारतीय संघाची मोठी चूक ठरू शकते.
शिखर धवन –
या यादीत संधी न मिळालेल्यामध्ये सर्वात आश्चर्यकारक नाव होते, ते म्हणजे शिखर धवनचे. कारण धवन हा भारतीय संघातील अत्यंत अनुभवी फलंदाज आहे. तसेच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामातील पहिल्या टप्प्यात देखील धवनचे अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन राहिले होते. ज्यामध्ये त्याने ८ सामन्यांमध्ये ५४ च्या सरासरीने ३८० धावा केल्या होत्या. यासह धवन आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
याच कारणामुळे धवनला श्रीलंका दौऱ्यात देखील संधी देण्यात आली होती. विशेष म्हणजे वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनला संघाचा कर्णधार म्हणून देखील नेमण्यात आले होते. त्यामुळे शिखराची यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत वर्णी लागेल, अशीच अपेक्षा वर्तवली जात होती. मात्र बीसीसीआयने आश्चर्यकारक निर्णय घेत सर्व चाहत्यांना मोठा धक्का दिला.
युजवेंद्र चहल –
भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलला देखील आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत वगळण्यात आले आहे. गेल्या अनेक काळापासून चहल भारतीय संघाचा एक महत्त्वाचा आणि मुख्य फिरकीपटू गोलंदाज होता. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत. त्यामुळे चहलचे देखील भारतीय संघातील स्थान जवळपास निश्चित होते. मात्र त्यालाही टी२० विश्वचषकासाठी संघात स्थान न देऊन बीसीसीआयने सर्वांना आश्चर्य केले.
तसेच चहलचे गेल्या काही काळापासून गोलंदाजीतील प्रदर्शन देखील कौतुकास्पद राहिले होते. त्यामुळे एक मुख्य गोलंदाज म्हणून चहलची भारतीय संघात निवड होणे हे पक्के होते. मात्र तरीही भारतीय संघाने चहलला संधी दिली नाही. त्याऐवजी गेल्या ४ वर्षांपासून संघातून बाहेर असलेल्या रविचंद्रन अश्विनची वर्णी लागली. चहलऐवजी बीसीसीआयने आर अश्विनला अनुभवी फिरकीपटू म्हणून संघात स्थान दिले.
शार्दुल ठाकुर –
गेल्या काही काळापासून शार्दुल ठाकूर आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आहे. शार्दुल हा वेगवान गोलंदाज आहे, तसेच तो फलंदाजी देखील चांगली करू शकतो. त्यामुळे त्याच्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील पाहिले जात होते. दरम्यानच्या काळातील त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे त्याने भारतीय संघाच्या तीनही स्वरूपात आपले स्थान निश्चित केले होते.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत होता. त्यामुळे शार्दुलला हार्दिक ऐवजी पर्यायी खेळाडू म्हणून पाहिले जात होते. तसेच त्याला देखील यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत संधी मिळेल अशी अपेक्षा वर्तवली जात होती. मात्र, बीसीसीआयने हार्दिक पंड्यावर विश्वास दाखवत त्याला संघात कायम ठेवले.
असे असले तरी शार्दुलला मात्र, बीसीसीआयने राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवले आहे. शार्दुल सोबत दीपक चाहर आणि श्रेयस अय्यर देखील राखीव खेळाडू म्हणून आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–टी-२० विश्वचषकासाठी नेदरलँड्स संघाची घोषणा; ४१ वर्षीय अष्टपैलू खेळाडूला दिले स्थान
–दक्षिण आफ्रिकेने नाकारले, नामिबियाने स्वीकारले! ‘या’ अफ्रिकन खेळाडूला टी२० विश्वचषकासाठी नामिबियाकडून संधी
–रवी शास्त्री-विराट कोहली अडकले वादात! परवानगीविनाच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला लावली होती हजेरी






