इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील शुक्रवारी (१० सप्टेंबर) होणारा पाचवा कसोटी सामना भारतीय ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे रद्द करण्यात आला. यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कार्यक्रमावेळी खेळाडूंना घालण्यात आलेल्या कोरोना नियमांचे पालन करण्यात आले नव्हते.
पंचतारांकित हॉटेलमध्ये चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यानंतर रवी शास्त्री गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल हे कोरोना संक्रमित आढळले होते. तसेच या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी (८ सप्टेंबर) भारतीय संघाचे सहयोगी फिजिओ योगेश परमार देखील कोरोना संक्रमित आढळून आले.
यानंतर खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करता पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचे ठरवले गेले. या कार्यक्रमादरम्यान कर्णधार विराट कोहली आणि काही अन्य खेळाडू देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बाहेरील व्यक्तींचा देखील समावेश होता.
रवी शास्त्री यांनी या कार्यक्रमासाठी बीसीसीआयकडून परवानगी घेतली नव्हती
ब्रिटनमध्ये सध्या कोरोनासंबंधी कठोर नियम नसल्यामुळे या कार्यक्रमात येणाऱ्या व्यक्तींनी मास्क घातलेले नव्हते. तसेच एका माहितीनुसार शास्त्री आणि कोहली यांनी या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बीसीसीआयची परवानगी देखील घेतली नव्हती.
याबाबत बोर्डाचे एक अधिकारी म्हणाले, “अध्यक्ष सौरव गांगुली किंवा सचिव जय शाह यांच्याकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. कदाचित त्यांना वाटले असेल की, ब्रिटनमध्ये कोरोनासंबंधित कठोर नियम नसल्यामुळे त्यांना परवानगीची गरज नाही.”
मात्र यासाठी भारतीय संघाचे प्रशासकीय अधिकारी गिरीश डोंगरे यांना अशा प्रकारच्या समारंभासाठी तमाम कागदी कारवायांसाठी नियुक्त करण्यात आले होते. ज्यांचे कामच आहे की अशा प्रकारच्या नियमांचे पालन होते की, नाही हे सुनिश्चित करणे.
ज्यानंतर सोशल मीडियावर ह्याबाबतीत अनेक चाहत्यांनी विराट कोहली आणि शास्त्री यांना दंड देण्याची ही मागणी केली जात होती. मात्र यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी शास्त्री आणि कोहली यांच्या या चुकीसाठी दंड मिळण्याची शक्यता नाही. हा शास्त्रींचा प्रशिक्षक पदाचा शेवटचा काळ आहे आणि कोहली हा संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्यांना दंडित केले जाऊ शकत नाही.
मात्र याबाबत प्रशासकीय अधिकारी डोंगरे यांची विचारपूस केली जाऊ शकते. यावर अधिकारी म्हणाले, “बीसीसीआयची अशी इच्छा होती, की खेळाडूंनी सामना खेळावा. मात्र, काही वरिष्ठ खेळाडू यानंतर खूप भयभीत झाले होते. ज्या नंतर दोन्ही संघातील बोर्ड त्यांच्या मानसिक स्वास्थ्यमुळे चिंतेत होते. ते १० दिवस विलगीकरणात आणि बायो बबलमध्ये रहावे लागत असल्यामुळे चिंतित होते. मात्र त्यांनी त्यावेळी समजूतदारपणा का दाखवला नाही, जेव्हा शास्त्रींना पुस्तक प्रकाशनासाठी जाऊ दिले.”
दरम्यान, पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही क्रिकेट बोर्डानंकडून शेवटचा कसोटी सामना नंतर खेळवण्यावर विचार सुरू आहे. त्यामुळे राहिलेला हा शेवटचा कसोटी सामना पुढील दौऱ्यात खेळला जाऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या –
–“कसोटी सामना रद्द होण्याचा आयपीएलशी काहीही संबंध नाही”, ईसीबीच्या मुख्य अधिकाऱ्याने केले स्पष्ट
–उर्वरित आयपीएलसाठी डेविड मलानऐवजी पंजाबने दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूवर केले शिक्कामोर्तब
–मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर आता इंग्लंडचे ‘हे’ ५ खेळाडू आयपीएलमधून घेऊ शकतात माघार






