विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौर्यावर असून, तेथे त्यांना इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळेल. त्यातील काउंटी एकादश विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्याला मंगळवारपासून (२० जुलै) डरहॅम येथे सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे खेळत नाहीत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या या सामन्यात न खेळण्याचे कारण दिले आहे.
भारतीय संघाला ग्रासले दुखापतींनी
काउंटी एकादश विरुद्धच्या पहिल्या तीन दिवसीय सराव सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा करताना दिसून आला. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे या सामन्यात खेळत नाहीत.
त्यांच्याविषयी बीसीसीआयने एका निवेदनाद्वारे सांगितले की, ‘विराट आणि अजिंक्य पहिल्या तीन दिवसीय सराव सामन्यात खेळणार नाहीत. विराटला पाठीचा हलका त्रास होत आहे तर, अजिंक्य याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवू लागला आहे. आमची मेडिकल त्यांच्यावर लक्ष ठेवून असून, दुसऱ्या सराव सामन्यात किंवा नोटिंगघममधील पहिल्या कसोटीत ते खेळताना दिसून येतील.’
वेगवान गोलंदाज आवेश खान झाला दुखापतग्रस्त
सराव सामन्यात काउंटी एकादशसाठी खेळत असलेल्या वेगवान गोलंदाज आवेश खान याला गोलंदाजी करत असताना हनुमा विहारीने मारलेला चेंडू अडवताना उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली.
पहिल्या सामन्यात भारताची दमदार फलंदाजी
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने काउंटी एकादश संघाविरुद्ध पहिल्या दिवशी ९ बाद ३०६ अशी धावसंख्या उभारली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर या सामन्यात यष्टिरक्षकाची भूमिका निभावत असलेल्या केएल राहुलने १०१ तर, अष्टपैलू रवींद्र जडेजाने ७५ धावांची खेळी केली. काउंटी एकादश संघाचे खेळाडू क्वारंटाईन असल्याने भारताचे वॉशिंग्टन सुंदर व आवेश खान काउंटी एकादशसाठी खेळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –