मुंबई। पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सोमवारी इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३८ वा सामना पार पडला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने ११ धावांनी विजय मिळवला. मात्र, चेन्नई सुपर किंग्ससाठी या सामन्यात पराभव स्विकारावा लागल्याने स्पर्धेतील पुढील प्रवास खडतर बनला आहे. चेन्नईचा हा हंगामातील ६ वा पराभव होता. या पराभवाबद्दल चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार रविंद्र जडेजा याने निराशा व्यक्त केली आहे.
सामन्यानंतर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) म्हणाला, ‘आम्ही चांगली सुरुवात केली होती. पण, मला वाटते आम्ही शेवटी १०-१५ धावा पंजाबला ज्यादाच्या दिल्या. आम्ही आमच्या योजनांची चांगल्याप्रकारे अंमलबजावणी करू शकलो नाही. अंबाती रायुडूने चांगली फलंदाजी केली. पण मी आधी म्हणालो तसे, आम्ही पंजाबला १७५ धावांच्या आत रोखले असते, तर योग्य झाले असते. आम्हाला, पहिल्या ६ षटकांत चांगली सुरुवात मिळाली नाही. त्याचीच आम्हाला कमी भासत आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही मजबुतीने पुनरागमन करू.’
चेन्नईने (CSK) आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामामध्ये आत्तापर्यंत ८ सामन्यांपैकी ६ सामन्यांत पराभव पत्करला आहे. त्यांना केवळ २ सामन्यांत विजय मिळवता आला आहे. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीतील त्यांचा मार्ग आता खडतर झाला आहे. चेन्नईला साखळी फेरीत अजून ६ सामने खेळायचे आहेत.
चेन्नईचा सहावा पराभव
सोमवारी झालेल्या सामन्यात (Punjab Kings vs Chennai Super Kings) चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, पंजाबच्या फलंदाजांनी त्यांचा हा निर्णय प्राथमिकत: चूकीचा ठरवला. पंजाबकडून शिखर धवन आणि मयंक अगरवालने चांगली सुरुवात केली, पण मयंक १८ धावा करून माघारी परतला. पण, त्यानंतर शिखरने भानुका राजपक्षाला साथीला घेत दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. त्यामुळे पंजाबने २० षटकांत ४ बाद १८७ धावा उभारल्या (PBKS vs CSK).
पंजाबकडून शिखर धवनने ८८ धावांची नाबाद खेळी केली. तसेच भानुका राजपक्षाने ४२ धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने २ आणि महिशा तिक्षणाने १ विकेट घेतली.
त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईकडून सुरुवातीला ऋतुराज गायकवाडने चांगला खेळ केला. पण तोही ३० धावा करून बाद झाला. पण, नंतर अंबाती रायुडूने ३९ चेंडूच ७८ धावांची खेळी करत चेन्नईला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे चन्नईला २० षटकांत ६ बाद १७६ धावाच करता आल्या. पंजाबकडून कागिसो रबाडा आणि रिषी धवनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
शिखर धवनचे विक्रमी अर्धशतक! चेन्नईविरुद्ध ८८ धावा ठोकत विराट, रोहितच्या पंक्तीत स्थान
IPL| चेन्नईविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्यात पंजाब दुसऱ्या क्रमांकावर, यादीत ‘हा’ संघ अव्वल
नशीब बलवत्तर! पंजाबच्या फलंदाजाला २ वेळा मिळाले जीवनदान, सीएसकेच्या खेळाडूंनी सोडले सोपे झेल