बिहार संघाने विजय हजारे ट्रॉफीची (Vijay Hajare trophy) सुरुवात अत्यंत धमाकेदार पद्धतीने केली आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात बिहारच्या फलंदाजांनी अक्षरश धुमाकूळ घालत 574 धावांचा डोंगर उभा केला आणि लिस्ट-ए क्रिकेटमध्ये नवा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित केला.
वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) या 14 वर्षीय फलंदाजाने केवळ 84 चेंडूत 190 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 16 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश होता. सकीबुल गनी या कर्णधाराने केवळ 40 चेंडूत 128 धावा ठोकल्या. यष्टीरक्षक
आयुषने 56 चेंडूत 116 धावांची स्फोटक खेळी केली. या फलंदाजीच्या जोरावर बिहारने तामिळनाडूचा (506 धावा) विक्रम मोडीत काढत इतिहास रचला.
बिहारने जागतिक विक्रम रचला असला, तरी प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogale) यांनी मात्र यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर (ट्विटर) लिहिले की, 50 षटकांमध्ये 574 धावांचा डोंगर उभा राहणे ही साजरी करण्याची गोष्ट नाही. हे आपल्या देशांतर्गत क्रिकेटच्या दर्जाबद्दल (Standard) चिंताजनक संकेत आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील गोलंदाजांची झालेली अवस्था पाहून भोगले यांनी हे मत व्यक्त केले आहे.
बिहारने 574 धावा करत तामिळनाडूचा 2022 मधील अरुणाचल प्रदेशविरुद्धचा 506 धावांचा विक्रम मोडला आहे. मात्र, खेळाच्या दर्जाबाबत आता क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.





