कानपूर कसोटीत भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध विजयापासून वंचित राहावे लागले. जगातील क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या कसोटी संघात हा सामना खेळला गेला. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या विकेटपर्यंत गेलेला हा सामना अनिर्णीत राहिला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या न्यूझीलंडने झुंज देत भारताला विजयापासून रोखले.
या निकालासह, भारतीय संघाची मालिकेत १-० ने आघाडी घेण्याची संधी हुकली. परंतु, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघाचे नुकसान झाले. भारतीय संघाने संपूर्ण १२ गुण जिंकण्याची संधी सोडली. तर न्यूझीलंडने सामना अनिर्णित राखत आपले खाते उघडले आहे. भारतीय संघ अजूनही गुणतालिकेत दुस-या क्रमांकावर आहे, मात्र, पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध विजय प्राप्त केला तर भारतीय संघाची तिस-या स्थानावर घसरण होऊ शकते.
ग्रीन पार्क स्टेडियमवर भारताने २३४ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य होते. भारताला न्यूझीलंडची पहिली विकेट चौथ्या दिवसअखेर मिळाली होती. अशा स्थितीत भारतीय संघाला शेवटच्या दिवशी ९ विकेट्सची गरज होती. तर न्यूझीलंडला २८० धावांची गरज होती. भारतीय फिरकीपटूंनी शेवटच्या दिवशी पूर्ण ताकद लावली आणि न्यूझीलंडचे ८ विकेट्स घेत, संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले. मात्र, अखेरच्या अर्ध्या तासात रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी जवळपास ९ षटके खेळून भारताला विजयापासून दूर ठेवले.
हा अनिर्णित सामना भारतीय संघासाठी पराभव ठरला. कारण, भारतीय संघाला या सामन्यात मिळालेल्या १२ गुणांऐवजी केवळ ४ गुण मिळाले आहेत. अशा प्रकारे, भारतीय संघाच्या डब्ल्यूटीसी गुणतालिकेत आता ३० गुण झाले आहेत आणि एकूण ५० गुणांची टक्केवारी झाली आहे. याचा अर्थ असा की, भारतीय संघाने आतापर्यंत स्पर्धेत ५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ६० गुणांपैकी त्यांना केवळ अर्धे गुण मिळालेत. दुसरीकडे, स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळणाऱ्या न्यूझीलंडला या कसोटीत ४ गुण मिळाले आहेत आणि ३३% गुणांसह ते पाचव्या स्थानावर पोहचले आहे.
डब्ल्यूटीसी गुणतालिकेच्या शीर्षस्थानी श्रीलंका संघ आहे. त्यांनी फक्त एक कसोटी सामना खेळला आणि विजयासह १००% गुण मिळवून पहिले स्थान पटकावले आहे. दुसऱ्या स्थानी भारत आहे. मात्र, पाकिस्तानी संघ या बाबतीत भारताला मागे टाकू शकतो. चितगावमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तान विजयापासून फक्त ९३ धावा दूर आहे. पाकिस्तानने तिथे विजय मिळवला तर तो भारताच्या पुढे दुसऱ्या क्रमांकावर जातील.
भारतीय संघाला ही मालिका जिंकण्याची शेवटची संधी आता मुंबई कसोटीत असेल. दुसरी कसोटी ३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकून पूर्ण १२ गुण मिळवावे लागतील, जेणेकरून ते गुणतालिकेत आपले स्थान सुधारू शकतील.