मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा खेळाडू बनविण्यात, सध्याची बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीची मोठी भूमिका आहे. धोनीने 2004 मध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तथापि, पदार्पण सामन्यात तो काही खास कामगिरी दाखवू शकला नाही. त्यानंतर काही सामन्यानंतर तत्कालीन संघाचा कर्णधार गांगुलीने मोठा निर्णय घेतला आणि फलंदाजीचा क्रम बदलला.
त्याने 2005 मध्ये धोनीला पाकिस्तान विरुद्ध विशाखापट्टणम येथील वनडे सामन्यात तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. धोनीनेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ करत सामन्यात 148 धावांची खेळी केली. गांगुलीने बऱ्याच वर्षानंतर धोनीचा फलंदाजीचा क्रम का बदलला? याचा खुलासा आहे.
यावर गांगुलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिले आणि सांगितले की, “जर सचिन वनडेमध्ये 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करत राहिला असता तर तो इतका महान खेळाडू ठरला नसता. विशाखापट्टणममध्ये धोनीला तिसर्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली, त्याने शतक ठोकले आणि जेव्हा जेव्हा त्याला अधिक षटके खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने मोठी धावसंख्या बनवली. जर सचिन 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करत राहिला असता तर तो तेंडुलकर बनला नसता, कारण आपल्याला खेळायला मुठभर चेंडू मिळतात.”
गांगुली पुढे म्हणाला की, धोनीच्या क्षमतेबद्दल अगोदरच माहिती होती, म्हणून त्याने हा निर्णय घेतला. या सामन्यापूर्वी धोनीने आपल्या नेतृत्वात चॅलेन्जर ट्रॉफीमध्ये शतक झळकावले होते. विशेष म्हणजे धोनीने सलामीला खेळताना हे शतक केले होते.