न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज अजाज पटेल याने भारताची फलंदाजी फळी उध्वस्त करत इतिहासाला गवसणी घातली आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने विक्रमी १० विकेट्स घेतल्या आहेत. यासह ही ऐतिहासिक कामगिरी करणारा तो जगातील तिसरा आणि न्यूझीलंडचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. याबरोबरच तो अजून एक विक्रम करणारा पहिला पहिलावहिला गोलंदाज बनला आहे.
डावखुऱ्या फिरकी गोलंदाज अजानने या सामन्याच्या पहिल्या दिवशीपासून भारतीय फलंदाजांवर आक्रमण करायला सुरुवात केली होती. पहिल्या दिवशी त्याने एकूण ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही आपली ही भेदक गोलंदाजी सुरू ठेवत त्याने भारताचा उरलेला अर्धा संघही तंबूत पाठवला. शेवटी मोहम्मद सिराजला झेलबाद करत त्याने भारताच्या पहिल्या डावाचा ३२५ धावांवर अखेर केला.
अशाप्रकारे या डावात ४७.५ षटके गोलंदाजी करताना ११९ धावा देत त्याने १० विकेट्स काढल्या. यासह तो परदेशात एका कसोटी डावात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज जॉर्ज लेहमन यांच्या नावे परदेशात एका कसोटी डावात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम केला होता. त्यावेळी १८९६ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत त्यांनी २८ धावांवर ९ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यांच्यानंतर गेल्या १२५ वर्षांत कोणालाही हा पराक्रम करता आला नव्हता. परंतु आता अजाज त्यांच्यावरही वरचढ ठरला आहे.
अजानने अशी घातली विक्रमाला गवसणी
अजाजने मुंबई कसोटीच्या पहिल्याच दिवसापासून आक्रमक गोलंदाजी केली. सर्वप्रथम सलामीवीर शुबमन गिल त्याची शिकार ठरला. त्याने ४४ धावांवर त्याला बाद करत त्याचे अर्धशतक हुकवले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली अशा अनुभवी शिलेदारांना त्याने शून्यावर तंबूत धाडले. पुढे श्रेयस अय्यर (१८ धावा) त्याचा पहिल्या दिवसातील शेवटचा विकेट ठरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा (२७ धावा) आणि अष्टपैलू आर अश्विन (० धावा) यांच्या त्याने एकाच षटकात सलग २ विकेट्स घेतल्या.
भारताच्या आघाडीच्या ६ फलंदाजांना बाद केल्यानंतर त्याचा सर्वात मोठा बळी ठरला, भारताचा दीडशतकवीर मयंक अगरवाल. टॉम ब्लंडलच्या हातून त्याने १५० धावांवर खेळत असलेल्या अजाजला झेलबाद केले. पुढे मैदानावर तळ ठोकलेल्या अष्टपैलू अक्षर पटेललाही त्याने अर्धशतकी खेळी केल्यानंतर आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर रचिन रविंद्रच्या मदतीने खालच्या फळीतील जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांनाही पव्हेलियनला पाठवत त्याने आपल्या १० विकेट्सचा कोटा पूर्ण केला.
महत्वाच्या बातम्या-
INDvsNZ, 2nd Test, 2nd Day Live: भारतीय गोलंदाजांचा कहर; न्यूझीलंडने २० षटकांत गमावल्या ८ विकेट्स
माजी विक्रमवीराची आजी विक्रमवीरावर कौतुकाची ‘जम्बो’ थाप! ‘तुझं स्वागत आहे या क्लबमध्ये’