टीम इंडियाचा युवा स्टार 15 वर्षांच्या फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) मागील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्याने इंग्लंडमधील 3 टी-20 सामन्यांमध्ये मिळून 42 धावा केल्या. तिथे त्याचे तीन सामन्यांमधील स्कोअर 14, 13 आणि 15 असे होते. तत्पूर्वी, झिम्बाब्वे दौऱ्यावर सूर्यवंशी काहीसा लयीत दिसला आणि त्याने तीन सामन्यांत 151 धावा करत ‘प्लेअर ऑफ द सीरीज’चा किताब पटकावला.
वैभव सूर्यवंशीची ही कामगिरी पाहिल्यानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अजिंक्य राहणेने (Ajinkya Rahane on Vaibhav Suryavanshi) त्याला सावध केले आहे.
अलीकडेच निवृत्ती घेतलेल्या राहणेला ‘स्टिक टू क्रिकेट’ पॉडकास्टमध्ये विचारण्यात आले की, सूर्यवंशी भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळेल का? यावर उत्तर देताना तो म्हणाला की, याबद्दल आत्ताच काही सांगणे कठीण आहे. या पॉडकास्टमध्ये डेव्हिड लॉयड, फिल टफनेल, तसेच इंग्लंडचे माजी कर्णधार एलिस्टर कुक आणि मायकेल वॉन हे देखील सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) काही काळापूर्वी कसोटी क्रिकेटसाठी सूर्यवंशीचे समर्थन केले होते. सूर्यवंशीचे वय आणि अनुभव जसा वाढेल, तसा तो कसोटी क्रिकेटमधील वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करायला शिकेल, असे सचिन म्हणाला होता.
राहणे पुढे म्हणाला की, मला या वेळी सूर्यवंशीवर कोणताही ताण टाकायचा नाही, कारण लोक आधीच त्याच्याबद्दल बरीच चर्चा करत आहेत. त्याने आतापर्यंत फक्त दोनच आयपीएल (IPL) हंगाम खेळले आहेत. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप फरक असतो. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता, तेव्हा तुमच्यावर वेगळ्या प्रकारचा दबाव असतो. आयपीएलमध्ये 4-5 षटकांत 70 धावांचा पाठलाग करणे सोपे असते, पण आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हेच काम खूप अवघड असते. त्यामुळे त्याला कोणत्याही दबावाशिवाय मोकळेपणाने आपला खेळ खेळू दिला पाहिजे.
सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक 776 धावा करून ‘ऑरेंज कॅप’ जिंकली होती. मात्र, आतापर्यंत खेळलेल्या 6 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला आयपीएलसारखी आक्रमक फलंदाजी करता आलेली नाही.
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने केवळ 19 चेंडूंत खणखणीत 50 धावा केल्या होत्या, पण दुसऱ्या सामन्यात तो 9 चेंडूंत 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने 49 चेंडूंत 81 धावांची दमदार खेळी केली होती.






