कोरोना काळानंतर भारतात स्थानिक क्रिकेटला सुरुवात झाली असून सध्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीचा थरार क्रिकेट रसिकांना बघायला मिळत आहे. आगामी काळात देखील भारतात स्थानिक क्रिकेटमधील सर्वात महत्वाची रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळली जाणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र नुकत्याच पुढे आलेल्या माहितीनुसार 87 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयने हा मोठा निर्णय कोरोनामुळे घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामने हे 4 दिवसीय असल्यामुळे स्पर्धेच्या आयोजनाला बराच वेळ खर्च होणार होता. आयपीएलचा चौदावा हंगाम 14 एप्रिल दरम्यान होणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट आहे. त्यामुळे बीसीसीआयकडे रणजी ट्रॉफी स्पर्धा आयोजित करण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी होता, जो पुरेसा ठरू शकला नसता. अशा परिस्थितीत बीसीसीआयने 50 षटकांची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे.
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी यासंदर्भात विविध क्रिकेट मंडळांना त्यांचे विचार मांडण्यास सांगितले होते. अशात बहुतांश क्रिकेट संघटनांनी विजय हजारे ट्रॉफी संदर्भात होकार दर्शवला. विजय हजारे ट्रॉफी सोबतच महिलांची क्रिकेट स्पर्धा व U19 स्पर्धा देखील खेळवल्या जाणार आहेत. या सर्व स्पर्धांची तारीख निश्चित झालेली नसली, तरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यादरम्यान या स्पर्धा खेळल्या जाण्याची दाट शक्यता आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धा ही भारतातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा आहे. सर्वप्रथम 1934 साली क्रिकेटर रणजित सिंग यांच्या नावे ही स्पर्धा खेळली गेली. रणजी ट्रॉफी इतिहासात मुंबईने सर्वाधिक 41 वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर वसीम जाफर यांनी सर्वाधिक 10 हजार 738 धावा केलेल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
क्वारंटीम..! रोहित शर्माने पत्नीसोबतचा फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, पाहा फोटो
…म्हणून गौतम गंभीरचा विरोध करत आहेत दिग्गज भारतीय तिरंदाज; पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लिहले पत्र