-आदित्य गुंड
तो जॉन अब्राहम बरोबर क्रिकेट खेळताना जॉनने त्याच्या चेंडूवर षटकार मारला. त्याने पुढचा चेंडू यॉर्कर टाकत जॉनच्या पायाचा वेध घेतला. क्रिकेट खेळून घरी जाताना वेदना असह्य झाल्याने जॉन लिलावती रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी तपासले असता त्याच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे कळले. वयाच्या १३ व्या वर्षी गल्ली क्रिकेट खेळताना आपल्या तुफान गोलंदाजीने त्याने सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या गोलंदाजीची भीती बसलेल्या प्रतिस्पर्धी संघाने मग पुढच्या सामन्याला तो खेळूच नये म्हणून त्याचे चक्क अपहरण केले. साहजिकच तो सामन्याला हजर राहू शकला नाही आणि त्याचा संघ सामना हारला. या दोन्ही गोष्टींतला हा मुलगा म्हणजे भारताचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी.
चेन्नईत जन्मलेला (27 सप्टेंबर) बालाजी चेन्नईकडून १९ वर्षाखालील संघातून क्रिकेट खेळला. रणजीत पदार्पण करण्याअगोदर बालाजी २००१-०२ मध्ये एम. जे. गोपालन चषकात कोलंबो डिस्ट्रीक्ट असोसिएशनविरुद्धआपला पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. प्रतिस्पर्धी संघात दिलशान तिलकरत्ने, थिलान समरवीरा, रंगना हेराथ, उपुल चंदना हे खेळाडू होते. त्या सामन्यात बालाजीने १६ षटकांत १० षटके निर्धाव टाकत फक्त १६ धावा देत ४ बळी मिळवले. या कामगिरीने त्याने तामिळनाडूच्या निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर लगेचच त्याला तामिळनाडूकडून रणजीमध्ये संधी मिळाली.
गोव्याविरुद्धच्या आपल्या पहिल्या रणजी सामन्याच्या आदल्या रात्री त्याला झोप लागू शकली नाही. सतत उठून तो कधी सकाळचे ६ वाजतायेत हे बघत राहिला. आपल्या पहिल्याच रणजी सामन्यात बालाजीने पहिल्या डावात २ तर दुसऱ्या डावात ५ बळी घेण्याची किमया साधली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने बलाढ्य कर्नाटकविरुद्ध ७ बळी मिळवत तामिळनाडूच्या विजयास हातभार लावला. त्या हंगामात हैद्राबादविरुद्ध ३, केरळविरुद्ध एकाच डावात ५ बळी, मुंबईविरुद्ध ६ बळी, रेल्वेविरुद्ध ४ बळी मिळवत आपल्या पहिल्याच हंगामात ३२ बळी मिळवत बालाजीने आपली क्षमता सिद्ध केली. त्यावर्षी फक्त चार गोलंदाजांनी रणजीमध्ये ३२ पेक्षा जास्त बळी मिळवले होते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केलेल्या बालाजीला नोव्हेंबर २००२ मध्ये झालेल्या विंडीज मालिकेसाठी भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळाले. आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बालाजीने ४ षटकांत तब्बल ४४ धावा दिल्या. त्यानंतर पुढचा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी त्याला एक वर्षाहून अधिक काळ थांबावे लागले.
एकदिवसीय सामन्यात आलेल्या अपयशाने खचून न जाता रणजीच्या आपल्या दुसऱ्या हंगामात २००२-०३ मध्ये बालाजीने हंगामा केला. रणजीच्या ७ सामन्यांत १४ च्या सरासरीने त्याने ४७ बळी मिळवत त्या हंगामातील सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज बनण्याचा मान मिळवला. यात त्याने एकूण ७ वेळेस एका डावात ५ बळी मिळवण्याची आणि ३ वेळेस सामन्यात १० बळी मिळवण्याची कामगिरी केली.
देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केलेल्या बालाजीला ऑक्टोबर २००३ मध्ये होणाऱ्या न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघात पाचारण करण्यात आले. एकदिवसीयप्रमाणे कसोटीमधले पदार्पणही त्याच्यासाठी फारसे लाभदायक ठरले नाही. दोन सामन्यांच्या या मालिकेत त्याला केवळ १ बळी मिळवता आला. एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारच्या सामन्यांत फारशी प्रभावी कामगिरी न करूनही २००४ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला संघात स्थान मिळाले. या मालिकेत त्याला कसोटीमध्ये संधी मिळाली नाही तरी एकदिवसीय सामन्यांत त्याने बरी कामगिरी करत १० सामन्यांत १२ बळी मिळवले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर झालेला पाकिस्तानचा दौरा बालाजीच्या कारकिर्दीत अतिशय महत्वाचा ठरला. या दौऱ्यातल्या एकदिवसीय मालिकेत त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याने शोएब अख्तर आणि मोहंमद सामीला मारलेल्या षटकारांसाठी तो अधिक प्रसिद्ध झाला. षटकार मारल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आपसूक आलेले हसू त्याची ओळख बनले. शोएब अख्तरला मारलेल्या षटकाराबरोबरचा त्याचा उडविलेला त्रिफाळाही भारतीय प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. शोएबच्या गोलंदाजीवर फलंदाजी करताना तुटलेली बॅट बालाजीने आजही जपून ठेवली आहे. या दौऱ्यातल्या एकदिवसीय मालिकेत त्याने ६ तर कसोटी मालिकेत १२ बळी मिळवत आपली भूमिका योग्य रीतीने बजावली. त्याच्या या दौऱ्यातल्या कामगिरीने पाकिस्तानचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशरर्फ यांनीदेखील त्याची स्तुती केली. तो पाकिस्तानात कुठेही जात असे तेव्हा तिथले प्रेक्षक त्याला उद्देशून, “बालाजी जरा धीरे चलो.” असे गाणे म्हणत. याच दौऱ्याने आपल्याला एक क्रिकेटपटू म्हणून ओळख दिली असे तो मानतो. याच दौऱ्यात भारताला इरफान पठाण नावाचा हिरादेखील सापडला. पाकिस्तान दौऱ्यात यश मिळालेल्या बालाजीकडे लोक आता भारताचा आघाडीचा गोलंदाज म्हणून पाहू लागले. त्या वर्षी झालेल्या आशिया करंडक आणि व्हिडीओकॉन करंडकात त्याची कामगिरी ठीकठाक राहिली. त्यानंतर तो दुखापतीमुळे काही काळ संघाबाहेर राहिला.
पुढच्या वर्षी २००५ मध्ये पाकिस्तान संघाने भारताचा दौरा केला. हाही दौरा बालाजीसाठी चांगलाच लाभदायक ठरला. या मालिकेत ३ कसोटी सामन्यांत १४ बळी मिळवत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. बालाजीची गाडी पुन्हा रुळावर येतेय असे वाटत असतानाच त्याच्या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले. पाठीच्या अतिशय गंभीर दुखापतीमुळे त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागले. त्याची कारकीर्द संपुष्टात येतेय की अशी भीतीदेखील काहीजणांनी व्यक्त केली. हा पठ्ठ्या मात्र हार मानणारा नव्हता. दुखापतीतून सावरत त्याने आपली गोलंदाजीची शैली बदलत पुरागमन केले. पुनरागमनानंतर २००९ मध्ये भारताकडून तो केवळ १ एकदिवसीय सामना खेळला.भारताकडून खेळलेल्या ८ कसोटी सामन्यांत २७ बळी आणि ३० एकदिवसीय सामन्यांत ३४ बळी अशी त्याची एकूण कारकीर्द राहिली.
भारताकडून संधी मिळाली नाही तरी २००८-०९ च्या हंगामात त्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा आपले नाणे खणखणीत वाजवले. पुनरागमनाच्या या हंगामात त्याने ७ सामन्यांत ३६ बळी मिळवत आपण अजून संपलो नसल्याचे सिद्ध केले. या हंगामात तामिळनाडूला रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीपर्यंत घेऊन जाण्यात त्याचे महत्वाचे योगदान राहिले.
याचवर्षी सुरु झालेल्या आयपीएलमध्ये बालाजी चेन्नईच्या संघाकडून खेळला. आयपीएलमधल्या आपल्या दुसऱ्याच सामन्यात त्याने हॅटट्रिक घेत ५ बळी मिळवले. आयपीएलमध्ये पहिली हॅटट्रिक घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर कायम राहील.
भारतीय संघातून बराच काळ बाहेर राहूनही आयपीएलमध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे २०१२ मध्ये बालाजीला टी २० विश्वचषकासाठी भारताच्या संघात स्थान मिळाले. टी २० विश्वचषकात त्याने ९ बळी मिळवत या प्रकारातली आपली उपयुक्तता सिद्ध केली. या स्पर्धेत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या षटकात जिंकून दिलेला सामना आजही अनेकांना आठवतो.
पुढे दोन तीन वर्षे बालाजी तामिळनाडूकडून खेळत राहिला. याच दरम्यान २०१४ मध्ये त्याने आपला शंभरावा प्रथम श्रेणी सामना खेळला. एका जलदगती गोलंदाजाने अतिशय गंभीर दुखापतीतून सावरत पुनरागमन करणे आणि १०० सामने खेळणे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. खेळाडू म्हणून २०१४-१५ चा हंगाम त्याच्यासाठी अखेरचा ठरला. या हंगामात त्याने ८ सामन्यांत १५ बळी मिळवले.
पुढच्या म्हणजे २०१५-१६ च्या हंगामात त्याची तामिळनाडूच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी म्हणून नेमणूक झाली. या हंगामात तो तामिळनाडूचा खेळाडूही होता मात्र तो एकही सामना खेळला नाही. दरम्यान तामिळनाडूमध्ये २०१६ मध्ये सुरु झालेल्या तामिळनाडू प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामात तो टुटी पॅट्रीऑटस कडून खेळला. बालाजीच्या या संघाने टीएनपीएलचे पहिले विजेतेपद मिळवले. त्यानतंर लगेचच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत बालाजीने १०६ सामन्यांत ३३० बळी मिळवले.
निवृत्तीनंतर २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. आयपीएलच्या यावर्षीच्या पर्वात त्याने चेन्नईच्या संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
बालाजीबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगतो. दक्षिणेत अनेकांची नावे बाला, बालाजी अशी असतात. त्यामुळे आपला ईमेल आयडी निवडताना बालाजीला आपले नाव असलेला ईमेल आयडी मिळेना. त्यावेळी आपल्याला ब्रेट ली आवडतो म्हणून त्याच्या एका मित्राच्या सूचनेवरून त्याने आपल्या ईमेल आयडीमध्ये बालाजी ऐवजी बालाली टाकले. योगायोग असा की पुढे जाऊन आयपीएलमध्ये त्याने ब्रेट लीबरोबर कोलकता नाईट रायडर्सकडून गोलंदाजी केली. त्यावेळी त्या दोघांना बालाली अशाच नावाने पुकारले गेले.
बालाजीच्या सतत हसण्यामागेही एक रहस्य आहे. त्याच्या जबडयावर एक शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्याची जबड्याची ठेवण अशी बनली की तो सतत हसत आहे असे समोरच्याला वाटत राहते. बालाजी रजनीकांतचा मोठा चाहता आहे. रजनीकांतच्या कोणत्याही चित्रपटाचा पहिला शो तो चुकवत नाही.
सेहवाग, गंभीर, आकाश चोप्रा यांच्यासारखे फलंदाज असलेल्या दिल्लीविरुद्ध २००२-०३ मध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात दुसऱ्या डावात मिळवलेले ५ बळी ही आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधली अविस्मरणीय खेळी असल्याचे तो मानतो. तसेच २००८-०९ च्या हंगामात बंगालविरुद्धच्या सामन्यांत एका हप्त्यात ७ धावांत ५ बळी मिळवत तामिळनाडूला उपांत्य फेरीत जाण्यास मदत झालेली त्याची निर्णायक कामगिरीही त्याची आवडती आहे.
वेगवान गोलंदाज आणि दुखापती हे समीकरण नवीन नाही. बालाजी तर दुखापतीमुळे जवळपास ३ वर्षे क्रिकेटपासून दूर राहिला. आजकाल ३ वर्षाचा काळ म्हणजे एखाद्या खेळाडूची आख्खी कारकीर्द असू शकते. स्पर्धाच इतकी आहे की तीन वर्षांत अनेक खेळाडू येऊन तुमची जागा घेऊ शकतात. अशी परिस्थिती असताना दुखापतीतून सावरणे ही एक गोष्ट आणि पुनरागमन करून पुढची ५-६ वर्षे स्पर्धात्मक क्रिकेट खेळणे ही दुसरी गोष्ट. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मनाची खंबीरता असल्याशिवाय हे शक्य होत नाही. बालाजीने ते करून दाखवले त्यामुळे तो निश्चितच कौतुकास पात्र ठरतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
इंग्लिश कर्णधार टीम इंडियाला म्हणाली ‘खोटारडे’! रनआऊट प्रकरण तापले
भुवनेश्वरच्या समर्थनात उतरला कर्णधार रोहित; हर्षलबद्दल म्हणाला…