क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज असतात, तुफानी वेगवान गोलंदाज असतात, धोकादायक वेगवान गोलंदाज असतात आणि एकच शोएब अख्तर असतो..
५० यार्डाचा लांबलचक रनअप, धिप्पाड शरीरयष्टी, खांद्यापर्यंत रूळणारे केस आणि जंगली जनावरांना दगड मारावे अशी खतरनाक बॉलिंग एक्शन. बॅट्समन थरथर कापत आणि टेलिव्हिजनवर विरुद्ध संघाचे चाहते शिव्यांची लाखोली वाहत. क्रिकेटचा खरा व्हीलन म्हणता येईल असा हा शोएब अख्तर.
पाकिस्तान म्हटले की, आशियातील वेगवान गोलंदाजांची खाण. महान इम्रान खान, स्विंगचा महारथी वसीम अक्रम, गुणवंत आकीब जावेद व धोकादायक वकार युनूस यांच्याच वेगवान गोलंदाजीच्या परंपरेचा पुढचा वंशज.
मोरगा या रावळपिंडी जवळच्या गावात शोएबचा जन्म झाला. त्या गावच्या जवळ पाकिस्तानी सैन्याचा एअर बेस कॅम्प आहे. अनेक फायटर विमाने तिथे आपला सराव करत असतात. शोएबचे वडील पेट्रोलपंपावर वॉचमन होते. शोएबसह एकूण सहा भावंडे. एवढ्या पोरांना पोटभर खाऊ घालणे हेच त्याच्या आईसाठी जिकरीचं काम होतं.
शोएब चालायला उशिरा शिकला. जन्मापासूनच त्याचे तळपाय सपाट आहेत. म्हणून त्याला लहानपणी कडेवर उचलून न्यावं लागायचं. स्वतःचे संतुलन देखील त्याला नीट सांभाळता येत नव्हते. भरीस भर म्हणून, श्वसनाचा देखील त्रास. सारख्या दवाखान्याच्या वाऱ्या ठरलेल्या असायच्या. शोएब जगेल की नाही याची खात्री कोणीच देऊ शकत नव्हते.
डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी शोएब सामान्य झाला. जरा मोठा झाल्यावर मात्र शोएबच्या अंगातली सगळी गर्मी बाहेर येऊ लागली. सारखी कोणाशी ना कोणाशी मारामारी ठरलेली असायची. तो शाळेला रावळपिंडीला जात. तिकडे जाण्यासाठी एक टेकडी उतरून जावे लागत. डोक्यावरून कायम फायटर जेट विमाने उडत असायची. शोएब त्यांची नक्कल करत त्या टेकडीवरून धावायचा. त्याचे सगळे मित्र वेड्यात काढायचे.
अख्ख्या भारतीय उपखंडाला जे व्यसन लागलं होंत ते क्रिकेटचे व्यसन त्यालाही लागले. जोरात धावत येऊन चेंडू फेकायला त्याला खूप आवडे. अगदी लहानपणी देखील दातओठ खाऊन तो चेंडू फेकायचा. त्याचा वेग बघून त्याला रावळपिंडीतील एका क्लबने खेळण्याची संधी दिली. भर उन्हात शोएब गोलंदाजीचा सराव करत. त्याला असं गोलंदाजी करताना पाहून कोणी काही बोललं तर तो म्हणायचा,
” मैं इम्रान खान बनने वाला हू । ”
लोक हसायचे, टर उडवायचे पण शोएब सगळ्यांवर दुर्लक्ष करत आपले काम सुरु ठेवत.
रावळपिंडीच्या क्लबसाठी खेळत असताना दुपारच्या जेवणावेळी तो डबा आणत नसे. घरात जास्त लोक असल्याने तो डबा आणूच शकत नव्हता. तेव्हा त्याने एक शक्कल लढवली. क्लबच्या बाहेर असलेल्या एका उसाच्या रसवाल्याला त्याने एक ऑफर दिली. तो त्या रसवाल्याला म्हटला,
” मिया, आप मुझे ना रोज दो गिलास गन्ने का जूस दिया करो । मै पाकिस्तान के लिए खेलूंगा ना तो आप को जूस निकालने की मशीन खरीद के दूंगा । ”
तो रसवाला त्याच्यावर हसत मात्र त्याला रोज दोन ग्लास रस सुद्धा देत. या अशा सटकलेल्या मुलावर विश्वास ठेवणारा कदाचित तो पहिलाच मनुष्य होता.
एक दिवस शोएबला समजल की लाहोरला पाकिस्तान एयरलाईन्सचा क्रिकेट टीम निवडण्यासाठीचा कॅम्प लागणार आहे. माजी क्रिकेटर झहीर अब्बास हे तरुण खेळाडूंची निवड करणार होते. शोएबकडे लाहोरला जायचे पैसे नव्हते. नेहमीच्या पद्धतीने कंडक्टरला बोलण्यात गुंडाळून तो लाहोरला येऊन पोहचला.
दुसऱ्या दिवशी निवड चाचणी होती. पण, आता रात्रभर राहायचे कुठे हा त्याच्यासमोर प्रश्न होता. त्याला एक टांगेवाला दिसला. त्या टांगेवाल्याचे नाव अजीज भाई. शोएब त्याच्यापाशी घुटमळत होता.
तेव्हा अजीज भाईने त्याला विचारले,
” कहा से हो ? क्या कर रहे हो ? ”
शोएबने त्याला उत्तर दिले,
” शोएब नाम है, पिंडी से आया हू, कल क्रिकेट का जो कॅम्प लगनेवाला है उसमे शरीक होने के लिए । ग्राउंड तक जाना है, मगर पैसे नही है । ”
अजीज : ” यानी क्रिकेटर हो ”
शोएब : ” हा, अगर आप मुझे आज रात के लिये यहा रूकने और खाने का इंतजाम कर देंगे तो, मै स्टार बनकर मिलने जरूर आऊंगा फक्त । ”
अजीज : ” तुम्हे क्या लगता है तुम पाकिस्तान के खेल पाओगे ? ”
शोएब : ” अल्लाह करे, लेकिन आज में आपके सामने खडा हूं और मुझे रहने के लिए जगह चाहिये ।
अजीज : ” तुम्हे सच मे लगता है तुम पाकिस्तान के लिए खेल पाओंगे ? ”
शोएब : ” जी, मेरे आखो में देखो, आपको दिखाई देगा । ”
अजीजला त्याचा आत्मविश्वास आवडला. त्याने शोएब व त्याच्या मित्राला जेवू घातले व दुसऱ्या दिवशी मैदानावर मोफत सोडले सुद्धा.
मैदानावर आल्यावर त्याला दिसले की, साऱ्या पाकिस्तानातून जवळपास दोन तीन हजार मुलं तिथे आली होती. शोएबला यायला उशीर झाला होता व त्याला नंबर मिळाला नव्हता. आता एवढ्या खेळाडूंमधून दोन दिवस आपला नंबर येणार नाही, हे त्याला माहीत होते. अब्बास यांचे लक्ष वेधण्याचे त्याने ठरवले.
२ किलोमीटर गोल मैदानावर भर उन्हात शोएबने धावायला सुरुवात केली. लहानपणापासून रावळपिंडीच्या रणरणत्या उन्हात पळायची त्याला सवय होते. अब्बास यांच्या जवळ जाई तेव्हा मात्र तो जोरात ओरडत असे. १-२ राऊंड पळल्यानंतर, अब्बास यांनी त्याला बोलावून घेतले.
अब्बास : ” क्या करते हो ? ”
शोएब : ” तेज बॉलिंग करता हु । ”
अब्बास : ” कितना तेज ? ”
शोएब : ” पाकिस्तान मे सबसे तेज ”
अब्बास यांनी त्याच्याकडे चेंडू दिला व टाकण्यास सांगितले. शोएबला आपल्या घराचे अठराविश्व दारिद्र्य संपविण्याची व पाकिस्तानसाठी खेळण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची ती संधी म्हणजे तो एक चेंडू होता.
५० मीटरचा रनअप घेत त्याने दातओठ खाऊन तो एक चेंडू फेकला. बाउन्सर चेंडू जाऊन सरळ फलंदाजाच्या हेल्मेटवर लागला. फलंदाज पडला मात्र अब्बास यांनी ओळखले की, हे जनावर साधं नाही. याला लवकरात लवकर पाकिस्तान संघाच्या गोठ्यात पाठवलं पाहिजे.
शोएब अख्तर नावाचे वादळ पाकिस्तानात घोंगवायला सुरवात झाली. काही वर्षातचं पाकिस्तानची हिरवी जर्सी त्याच्या अंगावर होती. मात्र, त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती १९९९ च्या भारत दौऱ्यामुळे.
इडन गार्डनवर सामना होता. पहिले दोन सामने जबरदस्त अटीतटीचे झाले होते. शोएबला पहिलीच संधी मिळाली होती. पाकिस्तान १८५ वर सर्वबाद झाला. भारताचा डाव सुरु झाला तेव्हा संध्याकाळ झाली होती.पहिलीच विकेट शोएबने लक्ष्मणला बोल्ड करून घेतली. त्यावेळी नाईट वॉचमन म्हणून आलेल्या अनिल कुंबळेला घेऊन द्रविडने कशीबशी संध्याकाळ निभावून नेली.
दुसऱ्या दिवशी शोएबच्या एका जबरदस्त यॉर्करवर द्रविड बोल्ड झाला. द्रविड आउट झाला तरी लोक आनंदाने ओरडत होते. शोएबला कळेना काय झालं. पुढच्या फलंदाजासाठी हा आरडाओरडा चाललेला. शोएब नेहमीप्रमाणे वेगात धावत आला. १५० च्या वेगाने चेंडू टाकला आणि फलंदाजाच्या बॅटला चूकवत चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळला. फलंदाज क्लीन बोल्ड.
८० हजार प्रेक्षकांनी भरलेल्या मैदानात स्मशानशांतता पसरली. पाकिस्तानचे सगळे चाहते आनंदाने ओरडत होते. शोएबला काहीच कळेना इतकी शांतता का पसरली ? त्याने वसीम अक्रमला याबाबत विचारले, तेव्हा अक्रमने उत्तर दिले,
” बेटा, तूने पेहली गेंद पर सचिन को आऊट किया है । दुनिया का सबसे बेहतरीन बल्लेबाज है वह, यहा का खुदा है । ”
सचिन, द्रविड, लक्ष्मण या जगातल्या सर्वोत्तम फलंदाजाना बोल्ड करून शोएब अख्तरने थाटात सुरवात केली होती. एकाच सामन्यात पाकिस्तानचा नवा हिरो झाला होता शोएब अख्तर.
भारतातून पाकिस्तानात गेल्यावर सर्व लोक अख्तरला भेटण्यासाठी आतुर होते मात्र शोएब लाहोरमध्ये अजीज भाईला शोधत होता. अजीज भाई भेटल्यानंतर शोएबने त्याला मिठी मारत म्हटले,
” कहा था ना, नाम याद रखना । ”
अजीज भाई प्रमाणेच त्याने रावळपिंडीतील त्या रसवाल्याला दिले वचन ही पूर्ण केले. रावळपिंडीला गेल्यावर त्याने सर्वप्रथम त्या रसवाल्याला रस काढण्याचे मशीन खरेदी करून दिले.
पुढे, तो जगातला सर्वात वेगवान गोलंदाज झाला. तिथनं १० वर्ष क्रिकेटवर त्याने राज्य केले. अनेक वादात सापडला. आपल्या उचाप्त्यानी, भांडणामुळे कायम चर्चेत राहिला. स्लेजिंग केली, मारामाऱ्या केल्या. क्रिकेटचा व्हिलन म्हणूनच त्याला टोपननाव दिलं गेलं. खुद्द पाकिस्तानी त्याला ५ वेळा नमाज पढत नाही म्हणून शिव्या द्यायचे.
पण त्याने कधी कोणाची पर्वा केली नाही, मनमौजी म्हणून तो जगत राहिला आणि कुप्रसिद्धी का असेना पण शोएबची पॉप्युलॅरिटी आजतागायत कमी झाली नाही. आज त्याचा वाढदिवस.