भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३७२ धावांनी विजय मिळवला. यासह ही मालिका १-० ने आपल्या खिशात घातली आहे. दरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही दिवसांपूर्वी टी२० संघाच्या कर्णधार पदावरून माघार घेतली होती, तर वनडे वनडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद देखील काढून घ्या,अशी मागणी जोर धरू लागली होती. परंतु, विराट कोहलीने अनेकदा सिद्ध केले आहे की,तो सर्वोत्तम कर्णधार का आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील त्याच्या दमदार नेतृत्वाचा एक उत्तम नजारा पाहायला मिळाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मायदेशात सर्वात मोठ्या अंतराने विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठमोठ्या सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. परदेशात जाऊन देखील भारतीय संघाने मालिका जिंकल्या आहेत, तर मायदेशात देखील भारतीय संघाचा बोलबाला राहिला आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध मिळवलेला ३७२ धावांचा विजय हा, मायदेशात धावांच्या तुलनेत मिळवलेला सर्वात मोठा कसोटी विजय ठरला आहे.
यापूर्वी भारतीय संघाने २०१५ मध्ये दिल्लीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला ३३७ धावांनी पराभूत केले होते, तर २०१६ मध्ये इंदोरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाला ३२१ धावांनी पराभूत केले होते. मुख्य बाब म्हणजे हे तिन्ही विजय विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत.
भारतीय संघाने मायदेशात मोठ्या अंतराने मिळवलेले विजय
३७२ धावा विरुद्ध न्यूझीलंड, मुंबई (२०२१)*
३३७ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दिल्ली (२०१५)
३२१ धावा विरुद्ध न्यूझीलंड, इंदोर (२०१६)
महत्त्वाच्या बातम्या –
मायभूमीवर २०१३ पासून टीम इंडिया अजेय! ‘या’ संघांना भारतभूमीत पाजले पराभवाचे पाणी
ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद! भारतातील ‘या’ मोठ्या स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे नेतृत्त्व
विराटचे कर्णधारपद, तर अजिंक्यचे उपकर्णधारपद धोक्यात, बीसीसीआयने दिला इशारा