काही दिवसांपूर्वीच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला होता. तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात तामिळनाडू संघाने बाजी मारत जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेनंतर आता देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील आणखी एका मोठ्या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. येत्या ८ डिसेंबर पासून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी ऋतुराज गायकवाडला एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा ८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे, तर या स्पर्धेचा अंतिम सामना २६ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या हाती देण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत देखील ऋतुराज गायकवाडला महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्याने आपल्या फलंदाजीने मोलाचे योगदान दिले होते.
ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. तो आयपीएल २०२१ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने १६ सामन्यात ४५ च्या सरासरीने ६३५ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने एक शतक आणि चार अर्धशतक झळकावले होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल स्पर्धेचे चौथे जेतेपद मिळवून देण्यात ऋतुराज गायकवाडने मोलाची भूमिका बजावली होती.
ऋतुराज गायकवाडची ही चमकदार कामगिरी पाहता चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी रिटेन केले आहे. तसेच श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. तसेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेला देखील त्याने जोरदार सुरुवात केली होती. त्याने सुरुवातीच्या ३ सामन्यांमध्ये सलग ३ अर्धशतक झळकावले होते. आता विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटचे कर्णधारपद, तर अजिंक्यचे उपकर्णधारपद धोक्यात, बीसीसीआयने दिला इशारा
‘शुबमन गिलची चांगली सुरुवात, पण…’, सचिन तेंडुलकरने दिली मोठी प्रतिक्रिया