गुवाहाटी | खो-खो हा खेळ आसामसाठी फारसा आवडीचा नाही. तरीही खेलो इंडिया युवा स्पर्धेत यजमानपद भूषविताना आसामला किमान एका गटात तरी पदक मिळावे, यासाठी त्यांनी या खेळाचे माहेरघर असलेल्या महाराष्ट्रातील प्रशिक्षकांचे सहकार्य घेतले आहे.
पुण्याचे माजी राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक जगदीश नानजकर व एजाज शेख यांना आसामच्या खो-खो संघटकांनी २१ डिसेंबरपासूनच पाचारण केले आहे. याबाबत नानजकर यांनी सांगितले, एरवी राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धांमध्ये आसामचा फारसा सहभाग नसतो.
एवढेच नव्हे तर आसाममध्येही फारशा राज्य स्तरावर स्पर्धा घेतल्या जात नाहीत. साहजिकच मुला-मुलींचे संघ निवडण्यापासूनच आमच्यापुढे आव्हान होते. खेलो इंडिया स्पर्धेसाठी आसाम संघांना आसामचेच प्रशिक्षक नियुक्त केले जाणार आहेत.
मात्र, आमच्यावरच खरी जबाबदारी आहे. मुलांच्या संघांमधील खेळाडूंना या खेळाचे थोडेसे तांत्रिक ज्ञान होते. मुलींंसाठी खो-खो चा श्रीगणेशाच होता.
सकाळ व सायंकाळ प्रत्येकी दोन ते अडीच तास खेळाचे प्रशिक्षण सत्र ठेवण्यात आले होते. प्रामुख्याने नैसर्गिक शारीरिक तंदुरुस्ती व वेगाने धावण्याची शैली ही आसामच्या खेळाडूंसाठी महत्त्वाची बाजू आहे.
फक्त खुंटावर गडी टिपणे, सूर मारून गडी बाद करणे, साखळीमध्ये पळणे आदी तांत्रिक बाजूंबाबत त्यांचे खेळाडू प्रत्यक्ष सामन्यात कशी कामगिरी करतात यावरच त्यांचे यशापयश अवलंबून आहे असेही नानजकर यांनी सांगितले.
त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी पुडुचेरी संघांनाही मार्गदर्शन केले होते. शेख यांनीही अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्रास विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
महाराष्ट्राला वर्चस्वाची संधी
गतवर्षी पुण्यात झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने १७ वर्षाखालील मुले व मुली तसेच २१ वर्षाखालील मुले व मुली या चारही गटात सुवर्णपदक जिंकले होते. यंदाही त्याच यशाची पुनरावृत्ती करण्याची त्यांना संधी आहे.