भारतामध्ये सध्या क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. एकीकडे टीम इंडिया बांग्लादेशशी कसोटी मालिकेत टक्कर देत आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटही सुरू आहे. नुकतेच दुलीप ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते. आता इराणी चषक खेळवला जाणार आहे. इराणी चषक 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनऊ येथे होणार आहे.
ज्यामध्ये नुकताच रणजी हंगाम जिंकणाऱ्या मुंबईचा सामना उर्वरित भारताशी होणार आहे. मंगळवारी (24 सप्टेंबर) दोन्ही संघाची घोषणा करण्यात आली. मुंबईने कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि शार्दुल ठाकूर या नावांसह सर्व प्रमुख खेळाडूंची निवड केली आहे. तर उर्वरित भारतामध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळाली आहे.
मात्र या मध्ये काही खेळाडू असे होते ज्यांची इराणी चषकासाठी निवड झाली नव्हती. दुर्लक्षित खेळाडूंमध्ये संजू सॅमसनच्या नावाचाही समावेश आहे. ज्याने दुलीप ट्रॉफीमध्ये बदली खेळाडू म्हणून स्थान मिळाल्यानंतर भारत ड संघाकडून खेळताना 2 सामन्यांच्या 4 डावांमध्ये 49 च्या सरासरीने 196 धावा केल्या. सॅमसन टीम इंडियाच्या कसोटी संघाचाही भाग नाही. त्यामुळे त्याची इराणी चषकासाठी निवड न होणे थोडे आश्चर्यकारक आहे. या बातमीद्वारे आम्ही सॅमसनची निवड न होण्यामागील 3 कारणांचा उल्लेख करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात..
3. ईशान किशनची उपलब्धता
ईशान किशनला भारताच्या उर्वरित संघात मुख्य यष्टीरक्षक म्हणून स्थान मिळाले आहे. ईशानने नुकतेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि त्यानंतर त्याने दोन शतके झळकावली. बुची बाबू स्पर्धेत त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावले आणि त्यानंतर दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत 111 धावांचे शतक झळकावले. दुसरीकडे संजू सॅमसनला यापूर्वी दुलीप ट्रॉफीमध्ये स्थान मिळाले नव्हते. मात्र ईशानच्या दुखापतीमुळे त्याला संधी मिळाली होती. अशा स्थितीत यष्टिरक्षक म्हणून सॅमसनला पहिली पसंती नव्हती हे स्पष्ट होते.
2. बांगलादेश विरुद्ध टी-20 मालिका
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारताला 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. सॅमसनची देखील या मालिकेसाठी निवड होण्याची अपेक्षा आहे. कारण तो श्रीलंकेतील टी-20 संघाचा भाग होता आणि त्यानंतर त्याने काही सामनेही खेळले. अशा परिस्थितीत त्याला टी20 फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ देण्यात आला हे एक कारण असू शकते.
1. कसोटी सामन्यांच्या योजनांमध्ये नसणे
संजू सॅमसनने भारतासाठी आतापर्यंत फक्त टी-20 आणि एकदिवसीय फॉरमॅट खेळला आहे. तर त्याने अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. भविष्यात सॅमसनला संधी मिळण्याची आशा कमी आहे. कारण नियमित यष्टिरक्षक रिषभ पंत परतला आहे. तर ध्रुव जुरेल देखील बॅकअपमध्ये आहे. जुरेलचीही इराणी चषकासाठी निवड झाली आहे. तथापि, तो टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चा भाग न झाल्यासच तो निवडीसाठी उपलब्ध असेल. अशा स्थितीत सॅमसनचा कसोटी प्लॅनमध्ये समावेश न करण्याचे संकेत आहेत आणि कदाचित त्यामुळेच निवडकर्त्यांनी त्याची निवड केली नाही.
हेही वाचा-
कोहली की रूट? सचिन तेंडुलकरचा विक्रम कोण मोडू शकतो; माजी क्रिकेटपटू स्पष्टचं म्हणाला….
7 षटकार, 86 चौकार अन् 498 धावा! गुजरातच्या खेळाडूचा बॅटनं कहर
रणजी ट्रॉफी 2024-25; विराट कोहलीचे 5 वर्षात प्रथमच दिल्लीच्या संभाव्य संघात नाव!






