आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ डिसेंबर २०२१ हा दिवस फक्त मुंबईच्या नावे लिहायचा असा जणू काही विधात्याने निर्धार केला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जन्माने मुंबईकर असलेल्या एजाज पटेल न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फिरकीपटूने विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाचे सर्व दहा गडी तंबूत पाठवले. २१ व्या शतकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू बनला.
त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीचे जगभरातून कौतुक होतेय. मात्र, या सगळ्या कौतुकाच्या वर्षावात अचानक देबाशिष मोहंती या भारतीय वेगवान गोलंदाजाची आठवण आली. त्याची आठवण येण्याचे कारण म्हणजे २१ व्या शतकात एकाच डावात सर्वच्या सर्व दहा गडी बाद करणारा तो पहिला गोलंदाज होता. मात्र, त्याने ही कामगिरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये केल्याने या कामगिरीला तितकेसे वलय प्राप्त झाले नाही.
लेकर जैसा जम्बो
इंग्लंडचे सर्वकालीन महान लेगस्पिनर जिम लेकर यांनी १९५६ ऍशेसमध्ये मॅंचेस्टर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे सर्व दहा गडी बाद करत थक्क करणारी कामगिरी करून दाखवली. या कामगिरीची पुनरावृत्ती होईल, अशी कोणाला शक्यताही वाटत नव्हती. मात्र, ४३ वर्षांनंतर या कामगिरीची बरोबरी झाली. दिल्लीच्या फिरोझशाह कोटला मैदानावर भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील कसोटी सामन्यात भारताचा लेगस्पिनर अनिल कुंबळे याने जम्बो कामगिरी करत लेकर यांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.
अनिल कुंबळे याने १९९९ मध्ये एका डावात दहा बळी घेण्याची कामगिरी केल्यानंतर सर्वजण अवाक् होते. प्रत्येक युवा गोलंदाज अशी कामगिरी करण्याचे स्वप्न पाहत होता. त्याच वेळी कुंबळेचा हा पराक्रम बरोबर करण्याचे शिवधनुष्य भारताच्याच एका आंतरराष्ट्रीय गोलंदाजाने उचलले.
मोहंतीचा ‘महापराक्रम’
जगभरातील सर्वात समृद्ध देशांतर्गत क्रिकेट म्हणून भारतीय क्रिकेटचा नावलौकिक आहे. त्याचाच एक भाग म्हणजे दुलीप ट्रॉफी. भारतातील वेगवेगळ्या विभागातील सर्व खेळाडूंचा मिळून एक संघ बनत. अशाच पाच विभागांचे पाच संघ मिळून दुलीप ट्रॉफी खेळली जात.
याच २००१ सालच्या दुलीप ट्रॉफीतील पूर्व विभाग विरुद्ध दक्षिण विभाग हा सामना आगरतळा येथील बिर बिक्रम कॉलेज स्टेडियम येथे होणार होता. कागदावर पाहिलं तर दोन्ही संघांमध्ये काही बरोबरच नव्हती. दक्षिण विभागाच्या संघात राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, जवागल श्रीनाथ व व्यंकटेश प्रसाद हे चार प्रमुख भारतीय खेळाडू होते. त्यांच्या सोबतीला श्रीधरन श्रीराम व विजय भारद्वाज हे त्यावेळचे ‘डोमेस्टिक जायंट’ ही. दुसरीकडे पाहायला गेलं तर, शिवसुंदर दास व देबाशिष मोहंती हेच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले मात्र, त्यामानाने लो प्रोफाइल खेळाडू पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व करत होते.
आगरतळाच्या आल्हाददायी वातावरणात दक्षिण विभागाचे नेतृत्व करणाऱ्या द्रविडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पूर्व विभागाच्या गोलंदाजीची धुरा खऱ्या अर्थाने नुकतेच भारतीय संघात खेळून आलेल्या मोहंतीवर होती. त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला सुरुवात केली. सलामीवीर श्रीराम व नंदकिशोर यांना त्याने झटपट तंबूत पाठवले. त्याने खरा धक्का तर कर्णधार द्रविडला बाद करत दिला आणि दक्षिण विभागाची अवस्था ३ बाद २२ अशी केली.
नव्या चेंडूने असा स्पेल पडतो, अशी सर्वांची धारणा झालेली. मात्र, मोहंती त्या दिवशी काही थांबलाच नाही. लक्ष्मण, भारद्वाज आणि तिलक नायडू या मुख्य फलंदाजांना बाद केल्यानंतर शेपूट कापुन काढायला त्याला वेळ लागला नाही. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रातच मोहंतीने दक्षिण विभागाला ११३ धावांवर सर्वबाद केले. मोहंतीचे गोलंदाजी पृथक्करण होते १९-५-४६-१०. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ‘परफेक्ट टेन’ मिळवणारा तो पाचवा गोलंदाज ठरला.
संघ ११३ धावांवर बाद झाला तरी दक्षिण विभाग हार मानणारा नव्हता. अनुभवी जवागल श्रीनाथने सहा गडी बाद करत पूर्व विभागाला १२४ धावांवर रोखले. मोहंतीने दुसऱ्या डावातही चार गडी बाद करताना दक्षिण विभागाचा १५७ धावांवर खुर्दा उडवला. विजयासाठी मिळालेले १६७ धावांचे आव्हान सहा गडी गमावत पूर्व विभागाने पार केले.
भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये यापूर्वी सुभाष गुप्ते, पीएम चॅटर्जी, पी सुंदरम व देवाशिष मोहंती हे चार गोलंदाज आहेत ज्यांनी परफेक्ट टेन मिळवले होते. मात्र, ‘ओरिसा एक्सप्रेस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोहंतीने प्रमुख भारतीय फलंदाजांविरुद्ध केलेली ही कामगिरी नेहमीच लक्षात राहिली.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/javagal-srinath-and-dravid-third-time-seen-10-wicket-haul/
शानदार… जबरदस्त…! एजाज पटेलने घेतल्या भारताच्या १० विकेट्; कुंबळे, लेकरच्या यादीत सामील
माजी विक्रमवीराची आजी विक्रमवीरावर कौतुकाची ‘जम्बो’ थाप! ‘तुझं स्वागत आहे या क्लबमध्ये’