पाकिस्तानचे माजी फिरकीपटू दानिश कनेरिया यांनी भारतीय अष्टपैलू दीपक चाहरबद्दल मोठे विधान केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात दीपक चाहरने उत्कृष्ट फलंदाजी केली आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला. ज्याप्रकारे त्याने फलंदाजी केली आणि भारतीय संघाला सामना जिंकण्यास मदत केली, त्यावरुन दानिश कनेरिया खूप प्रभावित झाले आहेत. त्याच्या खेळीमुळे प्रभावित होऊन त्यांनी चक्क आपल्या पाकिस्तानच्या संघातील फलंदाजाना त्याच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. इतकेच नव्हे तर दानिशने दीपक चहरच्या खेळीची तुलना एमएस धोनीशी केली.
दानिश यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर चाहरच्या फलंदाजीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “भारतीय संघाचा दुसऱ्या सामन्यात विजयी होण्याचे श्रेय पूर्णपणे दीपक चाहरला जाते. पाकिस्तानच्या फलंदाजांनी दीपक चाहरकडून काही तरी शिकले पाहिजे. तो शेवटपर्यंत सामन्यात टिकून राहिला. तो खेळपट्टीवर उभा राहिला, एकेरी-दुहेरी धावा काढल्या आणि चौकार देखील ठोकले. चहर आणि भुवनेश्वर कुमारने शेवटपर्यंत सामना सुरू ठेवला आणि जबरदस्त भागीदारी देखील केली. भुवनेश्वर कुमारने फक्त 19 धावा केल्या. परंतु, ते कोणत्या 50 धावांपेक्षा कमी नव्हते. दीपक चाहरने एमएस धोनीच्या शैलीचे अनुसरण केले आणि शेवटपर्यंत खेळत राहिला. भारतीय संघाने या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली.”
श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या विजयात दीपक चाहर नायक ठरला. तो संयमाने खेळत श्रीलंकेच्या गोलंदाजांना धैर्याने सामोरे गेला. अर्धशतकी खेळीनंतर शेवटच्या चेंडूवर चौकार खेचत 5 चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेच्या 276 धावांच्या आव्हानाचे प्रत्युत्तर देताना भारतीय संघाची सुरुवात चांगली नव्हती. या सामन्यात भारतीय संघाने 116 धावांवर 5 गडी गमावले होते. तर कृणाल पंड्याच्या रूपात 193 धावांवर 7 वी विकेट गमावली होती.
परंतु, खालच्या फळीतील फलंदाजीला आलेले उपकर्णधार भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर यांनी संघाला विजय मिळवून देण्याकरिता जबरदस्त भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी नाबाद 84 धावांची भागीदारी केली. तर दीपक चहरने आपल्या एकदिवसीय सामन्याच्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावत नाबाद 69 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय धुरंधर सूर्यकुमार यादव उत्कृष्ट कामगिरी करूनही आहे नाराज, स्वतः सांगितले त्यामागचे कारण