भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १७ नोव्हेंबरपासून मायदेशात टी२० मालिका खेळली जाणार आहे. यापूर्वी टी२० विश्वचषकात भारतीय संघात खूप सारे फेरबदल केलेले पाहायला मिळाले होते. टी२० विश्वचषकात भारतीय संघाची नवीन सलामीवीर जोडीही पाहायला मिलाळी होती. आता याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनी भारतीय संघाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते भारतीय संघाने हा निर्णय घाबरल्यामुळे घेतला होता आणि संघात एवढे सलामीवीर असणे योग्य नाही.
एका पॉडकास्टवर सबा म्हणाले की, “संघाच्या संरचनेला पाहता भारतीय निवडकर्त्यांची ही एक खूपच लवकर घेतलेली आणि घाबरेली प्रतिक्रिया आहे. अनेक सलामी फलंदाज राहुल, किशन, वेंकटेश अय्यर, गायकवाड, रोहित इत्यादी आहेत. वरच्या फळीत हे सगळे खेळाडू कुठे खेळणार ?” सीएसकेसाठी सलामी देत ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले होते.
“टी२० विश्वचषकात इशान किशनला सलामी करायला लावली होती. आता संघात वेंकटेश अय्यर फिट बसत आहे. नाहीतर तुम्ही या खेळाडूंना वेगवेगळ्या पोजीशनसाठी तयार करायला सुरुवात करा. तुम्हाला खेळाडूंसोबत स्पष्टपणे चर्चा करण्याची आणि त्यांची भूमिका विशेष स्वरूपात सांगण्याची आवश्यकता आहे.”, असे सबा करीम पुढे बोलताना म्हणाले.
न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्मावर असणार आहे. तो या संपूर्ण मालिकेत संघाचे प्रतिनिधितत्व करणार आहे. अशात रोहितसोबत सलामीसाठी केएल राहुल येईल, कारण तो सध्या त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आता इतर सलामीवीरांपैकी ज्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल त्यांना मधल्या फळीमध्येच खेळावे लागेल. विराट कोहलीही या मालिकेदरम्यान विश्रांतीवर असल्यामुळे त्याचे तिसऱ्या क्रमांकाचे स्थन रिक्त आहे आणि त्याठिकाणी खेळण्यासाठी सूर्यकुमार यादव प्रमुख दावेदार असेल.
दरम्यान, रोहितच्या नेतृत्वात पार पडणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणता खेळाडू कितव्या स्थानावर खेळतो आणि संघ काय रणनीती घेऊन मैदानावर उतरतो, हे पाहावे लागणार आहे. मालिकेतील पहिला टी२० सामना १७ नोव्हेंबरला जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळला जाईल.