भारतीय कसोटी संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. 12 जुलैपासून सुरू होत असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरेल. या मालिकेसाठी भारतीय संघाचे उपकर्णधारपद अनुभवी अजिंक्य रहाणे याच्याकडे देण्यात आले आहे. तब्बल दीड वर्ष भारतीय संघातून बाहेर असल्यानंतर नुकतेच पुनरागमन म्हणून केलेल्या रहाणेकडे पुन्हा ही जबाबदारी दिली गेली. याच मुद्द्यावर आता मागील बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या हनुमा विहारी याने मोठे वक्तव्य केले आहे.
रहाणे 2021 च्या अखेरीस भारतीय संघातून बाहेर झाला होता. त्यानंतर आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याला भारतीय संघात संधी दिली गेली. त्याने दोन्ही डावात भारतासाठी सर्वाधिक धावा बनवत संघातील आपली जागा निश्चित केली. त्यानंतर आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर तो संघाचा उपकर्णधार असेल.
रहाणे पुनरागमन करू शकला म्हटल्यावर आपण देखील भारतीय संघात पुन्हा जागा बनवू, असा विश्वास नुकताच विहारीने व्यक्त केला. तो म्हणाला,
“वयाच्या 35 व्या वर्षी अजिंक्य भारतीय संघात पुनरागमन करत असेल तर, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. तुमच्याकडे दर्जा असेल तर तुम्ही नक्कीच आपली कारकीर्द मोठी करू शकता. मी अजूनही 29 वर्षाचा असून माझ्याकडे देखील भरपूर वेळ आहे.”
विहारी याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आत्तापर्यंत 16 सामने खेळताना 839 धावा केल्या आहेत. त्याला भारतीय उपखंडात खेळण्याची कमी संधी मिळाली. असे असले तरी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत त्याचा खेळ शानदार झाला आहे. 2021 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी सिडनी कसोटी दुखापतग्रस्त असताना देखील त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत सामना निर्णय ठेवण्यात सिंहाचा वाटा उचललेला.
(Hanuma Vihari Hoping Team India Comeback After Ajinkya Rahane Redemption)
महत्वाच्या बातम्या –
सराव सामन्यात मुंबईकरांची सॉलिड ओपनिंग! विराट फ्लॉप, पुन्हा केली तीच चूक
‘या’ कारणाने रिंकू सिंगला नाही मिळाली टीम इंडियात जागा, थोडक्यात हुकली संधी