भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघांतील शेवटचा वनडे सामना चांगलाच रोमांचक झाला. विजयासाठी मिळालेले 226 धावांचे आव्हान पार करताना भारतीय संघाची दमछाक झाली. भारतीय संघही 225 धावाच करू शकल्याने या सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी ठरला व हा सामना बरोबरीत सुटला. सामन्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने या संपूर्ण दौऱ्यावर झालेल्या खराब अंपायरिंगचे वाभाडे काढले.
उभय संघांतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारीत 50 षटकांमध्ये बांगलादेशने 4 बाद 225 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघही 225 धावांवर सर्वबाद झाला. शेवटच्या षटकात भारताला तीन धावा हव्या होत्या. मात्र, षटकातील तिसऱ्या चेंडूवर मारुफा अख्तर हिने मेघना सिंग हिला यष्टीरक्षक निगर सुलतानच्या हातात झेलबाद केले. भारतीय संघाची ही शेवटची विकेट होती. परिणामी, सामना बरोबरीत समाप्त झाला.
या दौऱ्यावर भारतीय संघाने टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवलेला. तर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ पराभूत झालेला. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाची चव चाखावी लागलेली. तर, दुसरा सामना जिंकून भारतीय संघाने पुनरागमन केलेले.
या संपूर्ण मालिकेत अनेकदा खराब पंचगिरी पाहायला मिळाली. त्यामुळेच संतप्त झालेल्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने थेट पंच व बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे वाभाडे काढले. ती म्हणाली,
“मालिकेत ज्या प्रकारची अंपायरिंग होत होती. ज्यामुळे आम्ही खूप आश्चर्यचकित झालो होतो. पुढच्या वेळी आम्ही बांगलादेशात आल्यावर याची खात्री करून घेऊ की, आम्हाला या प्रकारच्या अंपायरिंगला सामोरे जावे लागेल आणि स्वतःला यासाठी तयार करावे लागेल”.
या मालिकेत पायचितच्या अनेक निर्णय भारतीय संघाच्या विरोधात गेलेले दिसले. तसेच, तिसऱ्या पंचांनीदेखील धावबादचे अनेक संशयास्पद निर्णय दिले.
(Harmanpreet Kaur Slams BCB And Umpires After ODI Series Against Bangladesh)
महत्वाच्या बातम्या –
माजी दिग्गजाचा मोठा दावा! सीएसकेचा पुढचा कर्णधार असेल युवा ‘हा’ खेळाडू
BREAKING: श्रीलंकेच्या विश्वविजेत्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती, वर्ल्डकपआधी घेतला धक्कादायक निर्णय