नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पाहुण्यांनी ८ विकेट्सने आपल्या नावे केला; तर दुसऱ्या सामन्यात यजमानांनी ७ विकेट्सने विजयी झेंडे रोवले. यासह ही टी२० मालिका सध्या १-१ ने बरोबरीवर आहे. या दोन्ही सामन्यात भारताचा विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली होती. अशात येत्या तिसऱ्या सामन्यात रोहित खेळताना दिसेल का? जर त्याला संधी दिली तर कोणाला वगळले जाईल? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
टी२० मालिकेपुर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलेल्या माहितीनुसार, रोहितला सुरुवातीच्या काही सामन्यात संघाबाहेर ठेवले जाणार होते. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याच्याजागी शिखर धवन; तर दुसऱ्या सामन्यात इशान किशन यांना संधी देण्यात आली होती. परंतु तिसरा टी२० सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्याची प्रतिस्पर्धी इंग्लंडची योजना असेल.
त्यामुळे रोहितच्या पुनरागमनाच्या शक्यता वाढल्या आहेत. परंतु रोहितला संधी दिल्यास भारतीय संघाला मोठ्या नुकसनाला सामोरे जावे लागू शकते. चला तर जाणून घेऊया कसं ते…
रोहितला संधी म्हणजे दुसऱ्या सलामीवीरांवर अन्याय!
रोहितला तिसऱ्या टी२० सामन्यात खेळवायचे असल्यास, सलामीवीर केएल राहुल किंवा इशान किशन यांच्यापैकी एकाला बाकावर बसवावे लागणार.
राहुल मागील २ टी२० सामन्यात अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करू शकला नाही. पहिल्या टी२० सामन्यात त्याने एक धाव तर दुसऱ्या टी२० सामन्यात शून्य धावा केल्या होत्या. परंतु यापुर्वीच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेत त्याने धावांचा पाऊस पाडला होता. आयपीएल २०२० हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना त्याने ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूसाठी) मिळवली होती. अशात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या २ टी२० सामन्यातील खराब प्रदर्शनानंतर त्याला संघातून बाहेर करणे अर्थात त्याच्यावर अन्याय झाल्यासारखे होईल.
दुसरीकडे नुकतीच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या इशानला एका सामन्यानंतर लगेचच बाकावर बसवणे थोडे चुकीचे ठरेल. कारण इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात त्याने अवघ्या २८ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. सोबतच आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर तो पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. त्यामुळे पुढे त्याला अधिकाधिक संधी मिळण्याची अपेक्षा असणार आहे.
तिसरा टी२० सामना १६ मार्च रोजी अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
पदार्पण केलं पण फलंदाजी राहिली, तिसऱ्या टी२०त सूर्यकुमारसाठी बलिदान देणार का कोहली?
“भुवनेश्वर कुमारच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे दुसऱ्या सामन्यात आम्ही प्रभावी गोलंदाजी केली”
दुसऱ्या टी२० सामन्यात खेळलेल्या ‘या’ तीन खेळाडूंना तिसऱ्या सामन्यात दाखवला जाणार बाहेरचा रस्ता?