भारतीय संघाने यंदाच्या टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत इतिहास रचला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने रविवार, ८ मार्च रोजी न्यूझीलंडच्या संघावर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत टी-२० विश्वचषक जिंकला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २५६ धावा केल्या.
भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी शानदार अर्धशतके झळकावली. या तिघांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर २५७ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची फलंदाजी पूर्णपणे कोसळली. किवी संघ संपूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि त्यांचा डाव १५९ धावांवर संपला.
या विजयासह भारताने एकाच वेळी तीन मोठे विक्रम रचले. सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा टीम इंडिया जगातील पहिला संघ बनला. भारत तीन टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला. याशिवाय, भारत आपल्या घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला आहे.
या ऐतिहासिक विजयासोबतच, भारतीय संघावर पैशांचा वर्षावही करण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या स्पर्धेसाठी एकूण सुमारे १२० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम निश्चित केली होती. विजेतेपद जिंकल्यानंतर भारताला ३ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २७.४८ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.
दुसरीकडे, मिशेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनाही मोठी रक्कम मिळाली. उपविजेता म्हणून, न्यूझीलंडला १.६ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १४.६५ कोटी रुपये देण्यात आले.
याव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिका आणि उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या इंग्लंड संघाला प्रत्येकी सुमारे ७.२४ कोटी रुपये देण्यात आले. सुपर-८ फेरीत पोहोचलेल्या परंतु उपांत्य फेरीत न पोहोचलेल्या संघांना सुमारे ३.४८ कोटी रुपये देण्यात आले. गट टप्प्यात खेळणाऱ्या प्रत्येक संघाला सुमारे २.२९ कोटी रुपयांची हमी रक्कम देण्यात आली.






