---Advertisement---

यंगिस्तान झिंदाबाद! साहेबांना लोळवत यंग इंडियाने पाचव्यांदा कोरले U19 विश्वचषकावर नाव

On: शनिवार, फेब्रुवारी 5, 2022 10:26 PM
Team-India-U19
---Advertisement---

आयसीसीच्या (ICC) एकोणीस वर्षांखालील पुरुष खेळाडूंच्या विश्वचषकाचा अंतिम सामना (U19 WC Final) भारत आणि इंग्लंड (INDU19 vs ENGU19) संघात झाला. शनिवार (५ फेब्रुवारी) रोजी होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, आधी गोलंदाजी व नंतर फलंदाजीत भारतीय संघाने लाजवाब कामगिरी करत इंग्लंडला ४ गड्यांनी पराभूत करत विश्वचषक आपल्या नावे केला. भारताने पाचव्यांदा एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकावर कब्जा केला आहे.

इंग्लंड संघाचा डाव सुरु होताच भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाजांनी इंग्लिश खेळाडूंना अक्षरशः हैराण करुन सोडले. रवी कुमार (Ravi Kumar) आणि राज बावा (Raj Bawa) यांनी एका पाठोपाठ एक धक्के देत इंग्लंड संघाचे कंबरडेच मोडले. संपूर्ण डावात रवी कुमारने ९ षटकात ३४ धावा देत तब्बल ४ बळी पटकावले. तर राज बावा याने संस्मरणीय खेळी साकारत ९.५ षटकात अवघ्या ३१ धावा देत ५ बळी घेत, अंतिम सामन्यात बळीचा पंच लगावला.

राज आणि रवी यांच्या जोडीला महाराष्ट्राच्या राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) आणि कौशल तांबे (Kaushal Tambe) यांनी सुरेख साथ दिली. कौशलने एलेक्स हर्टोन याचा महत्वपूर्ण बळी घेतला. मात्र, संपूर्ण डावात कौशलने घेतलेला अविस्मरणीय झेल सर्वांनाच थक्क करुन गेला.

एकीकडे इंग्लंड संघाची पडझड होत असताना ‘जेम्स रिव’ (James Rew) याने ‘जेम्स सेल्स’ (James Sales) याच्या साथीने एकहाथी किल्ला लढवत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. मात्र, जेम्स रिव ९५ धावांवर असताना भारतीय संघाच्या कर्णधाराने पुन्हा रवी कुमार याच्या हाती चेंडू सोपवला आणि रवीने देखील एक जादूई चेंडू टाकत जेम्स रिवला झेलबाद केले. मात्र, जेम्सचा हा झेल महाराष्ट्राचा पठ्ठ्या कौशल तांबेने ज्या लिलया पद्धतीने घेतला ते पाहून सारेच अवाक झाले.

हेही वाचा – भावा…एकदम कडक! ‘कौशल’च्या कौशल्याने सगळेच थक्क; U19 अंतिम सामन्यात घेतलाय भन्नाट कॅच

भारताकडून गोलंदाजीत राज बावा, रवी कुमार, कौशल तांबे यांनी प्रत्येकी ५, ४, १ असे बळी घेतले. तर, इंग्लंड संघाकडून जेम्स रिव (९५) जेम्स सेल्स (३४) जॉर्ज थॉमस (२७) यांनीच समाधानकारक धावा केल्या.

भारताने मिळविला विश्वविजय

इंग्लंडने दिलेले १९० धावांचे आव्हान पार करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी हा दुसऱ्याच चेंडूवर खातेही न खोलता बाद झाला. संघाच्या ४९ धावा झालेल्या असताना दुसरा सलामीवीर हरनूर सिंग २१ धावा करत माघारी परतला. त्यानंतर उपांत्य फेरीत शानदार द्विशतकी भागीदारी करणारी कर्णधार यश धूल व‌ उपकर्णधार शेख रशीद ही जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ४६ धावा जमविल्या. मात्र, रशीद वैयक्तिक अर्धशतक करून तर यश १७ धावा करून माघारी परतल्याने भारतीय संघ संकटात सापडला.

कर्णधार व उपकर्णधार माघारी परतल्यानंतर या विश्वचषकातील दोन सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा निशांत सिंधू व अष्टपैलू राज बावा यांनी भारतीय संघाला सहीसलामत संकटातून बाहेर काढले. गोलंदाजीत पाच बळी मिळवणाऱ्या राज बावाने फलंदाजीत ३५ धावांचे योगदान दिले. भारतीय संघ विजयापासून २६ धावा दूर असताना तो बाद झाला. त्याने निशांतसह ६७ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. त्यानंतर आलेला कौशल तांबे केवळ एका धावेचे योगदान देऊन बाद झाला. निशांतने एक बाजू लावून धरत अर्धशतक साजरे केले. संघिसाठी संपूर्ण स्पर्धेत फिनीशरची भूमिका निभावणार्या एसटी यष्टीरक्षक दिनेश बानाने सलग दोन षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.

 

हेही वाचा –

मोठी बातमी.! वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी ‘या’ दोन खेळाडूंचा भारतीय संघात समावेश

विराटनंतर ‘असा’ असेल भारताचा नवीन कसोटी कर्णधार; बीसीसीआय अध्यक्षांशी दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---