भारतीय संघ वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालबरोबर सलामीला फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा त्याची साथ देण्याची शक्यता आहे. परंतु इतर फलंदाज विशेषत: युवा फलंदाज पृथ्वी शॉच्या दावेदारीलाही कमी लेखता येणार नाही.
रोहितने (Rohit Sharma) मागील ७ वर्षांमध्ये भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीचा प्रश्न मिटविला आहे. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये सलामी जोडीसाठी अजूनही धडपड करावी लागत आहे.
रोहितला मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करण्यास पाठविले होते तसेच तो यामध्ये यशस्वीही राहिला. परंतु त्याची खरी परीक्षा तर परदेशात होणार होती आणि न्यूझीलंड दौऱ्यापूर्वीच तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारताला २०२०मध्ये खेळण्यात आलेल्या २ कसोटी सामन्यांमध्ये नवीन सलामी जोडीसोबत उतरावे लागले होते.
यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे आता कसोटीतही खेळण्याचा आपला दावा मजबूत करत आहे. याव्यतिरिक्त मुरली विजय आणि शिखर धवनची दावेदारीही नाकारता येऊ शकत नाही. मागील ५ वर्षांमध्ये भारतीय संघाने धवन, राहुल, विजय, अगरवाल, रोहित, पार्थिव पटेल, पृथ्वी शॉ, गौतम गंभीर, हनुमा विहारी, अभिनव मुकुंद तसेच तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा चेतेश्वर पुजारा या खेळाडूंनाही डावाची सुरुवात करण्यासाठी पाठविले आहे.
यामध्ये भारतीय संघाने हे खेळाडू मिळवून १५ जोड्या आतापर्यंत आजमावल्या आहेत. राहुलने सर्वाधिक ३२ सामन्यांमध्ये सलामीला फलंदाजी केली, तर विजयने २९, धवनने २१ आणि अगरवालने ११ सामन्यात ही जबाबदारी पार पाडली आहे.
अगरवालने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१८ मध्ये मेलबर्न येथे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि सलामीच्या २ पैकी १ जागेवर आपला जम बसविला. त्याने आतापर्यंत ११ सामन्यात १७ डावांमध्ये ९७४ धावा केल्या आहेत. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या ४ डावांमध्ये त्याने १०२ धावा केल्या होत्या, तर शॉने ९८ धावा केल्या होत्या.
तसं पाहिलं तर या मालिकेत सर्व भारतीय फलंदाज अपयशी ठरले होते. रोहित कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा डावाची सुरुवात करण्यासाठी उत्सुक असेल. त्याने मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणममध्ये पहिल्यांदा ही भूमिका निभावली होती आणि दोन्ही डावांमध्ये अनुक्रमे १७६ आणि १२७ धावा ठोकत विक्रम केला होता.
त्यानंतरही रोहित थांबला नाही. त्याने रांची येथे २१२ धावांची अप्रतिम खेळी केली. परंतु बांगलादेशविरुद्ध दोन्हीही कसोटी सामन्यात त्याला फारसे यश आले नाही.
पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आतापर्यंत ४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३३५ धावा केल्या आहेत.
जर मागील ५ वर्षांमध्ये इतर देशांच्या सलामी जोडींबद्दल चर्चा केली, तर इंग्लंड आणि श्रीलंकानंतर भारतीय संघाने सर्वाधिक फलंदाजांकडून डावाची सुरुवात केली आहे. यामध्ये इंग्लंडने तब्बल १७ वेळा, श्रीलंकेने १२ वेळा, भारताने ११ वेळा, दक्षिण आफ्रिकेने १०, तर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने प्रत्येकी ९ खेळाडूंना सलामीवीर फलंदाज म्हणून आजमावले आहे.
न्यूझीलंडने मागील ५ वर्षांमध्ये केवळ ४ खेळाडूंकडे डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी सोपविली आहे.
टॉम लाथममुळे न्यूझीलंडने स्थिरता दर्शविली आणि गेल्या पाच वर्षांत त्यांच्याकडून केवळ ४ खेळाडू सलामीला आले. लाथमने गेल्या पाच वर्षांत आपल्या संघासाठी ४२ सामन्यांमध्ये डावाची सुरुवात केली आहे.