युएईमध्ये रंगलेल्या आयपीएल २०२० चा समारोप काल (१० नोव्हेंबर) दुबईत झाला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर एकतर्फी मात करत; आपले विजेतेपद राखले. या विजेतेपदासोबत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा कर्णधार बनला. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने मागील आठ आयपीएल हंगामापैकी पाच हंगाम आपल्या नावे केले आहेत. संघाच्या या दैदिप्यमान कामगिरीविषयी बोलताना; रोहितने आपल्या खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले.
अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना रोहित म्हणाला, “संपूर्ण हंगामात ज्याप्रकारे एक संघ म्हणून आम्ही खेळलो; त्याबद्दल मी अत्यंत खूष आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच मी म्हटलेलं की, आपण गतविजेते आहोत आणि आपली विजयाची सवय मोडता कामा नये. यापूर्वी आपण जसे खेळलो आहोत फक्त तोच खेळ पुन्हा दाखवायचा आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आम्ही विजयाच्या उद्देशाने खेळत होतो. संघातील खेळाडूंव्यतिरिक्त प्रशिक्षकांचे आणि इतर कर्मचारी वर्गाचे देखील या विजयात तितकेच योगदान आहे.”
… खेळाडूंना आहे जबाबदारीची जाणीव.
आपल्या संघातील वरिष्ठ खेळाडूंविषयी सांगताना रोहित म्हणाला, “स्पर्धेच्या सुरुवातीला आम्हाला फक्त एक योग्य अंतिम अकरा खेळाडूंचा संघ हवा होता. सुदैवाने सर्व खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये असल्याने, तो आम्हाला लवकर मिळाला. एक कर्णधार म्हणून मी कधीही कोणत्या खेळाडूवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम माझे आणि प्रशिक्षकांचे असते. संघातील सर्व खेळाडूंना आपल्या जबाबदारीची योग्य जाण आहे. पोलार्ड, हार्दिक आणि कृणाल गेली अनेक वर्ष, संघासोबत आहेत आणि त्यांना तुम्ही कसे खेळावे हे सांगावे लागत नाही.”
… म्हणून, राहुल चाहर नाही खेळला अंतिम सामन्यात
संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेला युवा लेगस्पिनर राहुल चाहरला अंतिम सामन्यात न खेळविण्याविषयी विचारले असताना रोहित म्हणाला, “राहुलला अंतिम सामन्यात न खेळविण्याचा निर्णय हा खराब कामगिरीमुळे घेण्यात आला नव्हता. खरंतर, राहुलने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. मात्र, दिल्लीच्या संघात डावखुरे फलंदाज जास्त असल्याने एक रणनीतीचा भाग म्हणून, जयंत यादवला संधी देण्यात आली.”
… मी सूर्यासाठी माझा बळी द्यायला हवा होता.
सूर्यकुमार यादवच्या दुर्दैवीपणे धावबाद होण्याविषयी दिलगिरी व्यक्त करताना रोहित म्हणाला, “मला चेंडूचा अंदाज आला नाही आणि मी धावत सुटलो. मात्र, माझ्यासाठी सूर्याने आपल्या बळीची कुर्बानी दिली. खरंतर, तो ज्या प्रकारे संपूर्ण स्पर्धेत खेळला त्यासाठी मी असं काहीतरी करायला हवं होतं. सूर्याचे या हंगामातील योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे.”
रोहित शर्मा या विजेतेपदासह कर्णधार म्हणून पाच तर खेळाडू म्हणून सहाव्यांदा आयपीएलचा विजेता बनला आहे. २००९ आयपीएलमध्ये त्याने डेक्कन चार्जर्सकडून खेळाडू म्हणून पहिली आयपीएल ट्रॉफी उचलली होती. त्यानंतर २०१३,२०१५,२०१७,२०१९ व २०२० अशी पाच वर्ष मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याने आयपीएलची विजेतेपदे पटकावली.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितमुळे सूर्यकुमारच्या आयपीएलचा शेवट खराब? ‘त्या’ एका चुकीमुळे विनाकारण गमावली विकेट
वाह क्या बात हैं! १० वर्षांत मुंबई इंडियन्सने जिंकल्यात ७ फायनल्स
मुंबई इंडियन्सच्या पाचही आयपीएल विजेत्या संघात रोहित व्यतिरिक्त केवळ ‘हा’ खेळाडू होता सहभागी