अहमदाबाद| इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ या हंगामात अनेक आश्चर्यकारक बाबी पाहायला मिळाल्या. आयपीएलचे मुंबई इंडियन्सने पाच वेळा आणि चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा विजेतेपद पटकावले आहेत. मात्र, या हंगामात हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाला राहिले, तर आयपीएलमध्ये पदार्पण करणारा गुजरात टायटन्स संघ अंतिम सामन्यात पोहोचला.
पंधराव्या आयपीएल हंगामाच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना रविवारी (२९ मे) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार असून त्याला सायंकाळी आठ वाजता सुरूवात होणार आहे.
राजस्थानने दुसऱ्या क्वालिफायर (२७ मे) सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा ७ विकेट्सने पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मात्र, अंतिम सामन्यात गुजरातचेच पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
आयपीएलच्या मागील चार वर्षात विजेतेपद जिंकणाऱ्या संघाने विरोधी संघाला साखळी सामन्यांमध्ये पराभूत केले आहे. जर हे गणित जुळून आले, तर राजस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागेल. राजस्थान आणि गुजरात या हंगामात दोन वेळा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यात गुजरातच विजयी ठरला आहे.
तब्बल १४ वर्षानंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या राजस्थानचा संघाचा प्रवास गुजरातच्या तुलनेत अवघड राहिला, तर हार्दिक पंड्या कर्णधार असलेला गुजरातचा संघ हंगामाच्या सुरुवातीपासूनच जोमात दिसला आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थानने १४ साखळी सामन्यातील ९ सामन्यांत विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले होते. यामध्ये १४ एप्रिलला गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यांत त्यांना ३७ धावांनी पराभूत व्हावे लागले होते, तर पहिल्या क्वालिफायर सामन्यातही त्यांना गुजरातकडून पुन्हा एकदा पराभवाचा झटका बसला. यामुळे त्यांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी अजून एक सामना खेळावा लागला होता.
राजस्थानने या हंगामात फलंदाजी आणि गोलंंदाजी या दोन्हा प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. तसेच, त्यांचा सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) हा भलताच फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने या हंगामात चार शतके ठोकली असून उत्तम क्षेत्ररक्षणही केले आहे. त्याच्या १६ सामन्यात ८२४ धावा असून ऑरेंज कॅपही त्याच्याकडे आहे.
तसेच, गोलंदाजीत युजवेंद्र चहलने १६ सामन्यात २६ विकेट्स घेतल्या असून त्याला पर्पल कॅपवर आपला हक्क दाखवण्यासाठी एकाच विकेटची गरज आहे. सध्या बेंगलोरचा वनिंदू हसरंगा १६ सामन्यात २६ विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.
अंतिम सामना गुजरात संघ घरच्याच मैदानावर खेळत असल्याने त्यांची ही एक जमेची बाजू आहे, तर गोलंदाजी आणि फलंदाजी क्षेत्रात आपलाच बोलबाला असलेल्या राजस्थानला अंतिम सामन्यात हल्लाबोल करण्यासाठी त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावतच ठेवणे आवश्यक आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2022 मध्ये शेवटच्या वेळी एकत्र जमला आरसीबी संघ, दिनेश कार्तिकने जिंकले चाहत्यांचे मन
आयपीएलच्या फायनल आधीच चहलच्या पत्नीने लावला ठुमका, ‘जिगल जिगल’ गाण्यावरील व्हिडिओने लुटली वाहवा!