भारताची माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. यावेळी तिने सर्वांचे आभार मानले आहेत.
तिने निवृत्तीची घोषणा करताना आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता मी तुमच्या आशिर्वादाने आणि पाठिंब्यासह माझ्या दुसऱ्या इनिंगसाठी उत्सुक आहे.’ तसेच तिने या पोस्टमध्ये लिहिले की, ‘सर्व प्रवासांप्रमाणेच या प्रवासाचासुद्धा शेवट होणारच होता. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वप्रकारातून निवृत्ती घेत आहे.’
याशिवाय तिने लिहिले की, ‘प्रत्येकवेळी जेव्हा मी मैदानावर पाऊल ठेवले, तेव्हा मी भारताला जिंकवण्यासाठी माझे सर्व प्रयत्न केले. तिरंग्याचे प्रतिनिधित्त्व करायला मिळालेल्या संधीला मी नेहमीच लक्षात ठेवेल. मला वाटते आता माझ्या कारकिर्दीवर पडदा टाकण्याची योग्य वेळ आहे. संघाकडे प्रतिभाशाली युवा खेळाडू असून भारतीय संघाचे भविष्य उज्वल आहे.’
याशिवाय तिने असेही म्हटले आहे की, अनेकवर्षे तिला भारतीय महिला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल अभिमान वाटत आहे. यामुळे तिला व्यक्ती म्हणून घडण्यात मदत झाल्याचेही ती म्हणाली. याव्यतिरिक्त ती असेही म्हणाली की, तिला आशा आहे, तिच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेटला योग्य आकार मिळाला असेल.
३९ वर्षीय मितालीने (Mithali Raj) खेळाडू म्हणून निवृत्ती घेतलेली असली तरी, क्रिकेटशी जोडून राहण्याचा आणि भारतात व जागतिक स्तरावर महिला क्रिकेटच्या प्रगतीत योगदान देण्याचा मानस व्यक्त केला. तसेच तिने बीसीसीआय आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचेही आभार मानले. त्याचबरोबर चाहत्यांबद्दलही तिने प्रेम व्यक्त करताना त्यांना धन्यवाद म्हटले आहे.
मितालीने यापूर्वीच २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आता तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेतली आहे. ती अखेरचे यावर्षी न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकात खेळताना दिसली होती. (Mithali Raj announces retirement from international cricket)
Thank you for all your love & support over the years!
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
मितालीच्या निवृत्तीनंतर नेटकरी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.
मितालीची कारकिर्द
मितालीने १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यामुळे तब्बल २३ वर्षांनंतर तिने अखेर क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तिने वनडे क्रिकेटमध्ये २३२ सामने खेळताना ५०.६८ च्या सरासरीने ७८०५ धावा केल्या आहेत. तर ८९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २३६४ धावा आणि १२ कसोटी सामन्यात ६९९ धावा नोंदवल्या आहेत. ती वनडेमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी आणि सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू आहे.
तसेच तिने १५५ वनडे सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले असून ८९ सामने जिंकले आहेत. तसेच ६३ सामन्यांत तिला कर्णधार म्हणून पराभव पाहावा लागला आहे. त्याचबरोबर ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. त्याचबरोबर तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २००५ आणि २०१७ साली महिला वनडे विश्वचषकाचा उपविजेता राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाने १५ वर्षांनंतर केली इतिहासाची पुनरावृत्ती, श्रीलंकेवर केली १० गडी राखत मात
काय सांगता! भारत कधीही मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकला नाही टी२० मालिका, पाहा आकडेवारी
द्रविडसह पंत, श्रेयस, केएल अन्य भारतीय संघापेक्षा ३ दिवस उशीरा जाणार इंग्लंडला; ‘हे’ आहे कारण