नुकताच वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धा (Icc under 19 world cup) पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. भारतीय संघातील खेळाडूंनी इंग्लंड संघाला पराभूत करत जेतेपदावर आपले नाव कोरले. या भारतीय संघात अनेक असे खेळाडू आहेत, जे भविष्यात भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतात. या खेळाडूंसाठी बीसीसीआयने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत खेळलेले काही खेळाडू पुढे जाऊन वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व करत असतात. परंतु काही खेळाडूंना वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याची संधी मिळत नाही. अशा खेळाडूंसाठी बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे. असे म्हटले जात आहे की, ‘ नॅशनल क्रिकेट ॲकेडमीमध्ये १९ वर्षांवरील खेळाडूंना प्रवेश दिला जाऊ शकतो. यामागील मुख्य कारण म्हणजे, खेळाडूचे वय १९ झाल्यानंतरही ते खेळाडू क्रिकेट प्रणालीचा भाग राहतील.
शेख राशिद (आंध्रप्रदेश ), रवी कुमार (बंगाल) राज बावा (चंदीगड ) आणि यश धुल (दिल्ली ) हे असे खेळाडू आहेत जे आपल्या राज्याच्या संघात स्थान मिळवू शकतात. परंतु या १९ वर्षाखालील संघातील अनेक खेळाडू रणजी ट्रॉफी स्पर्धेत अडकून राहतील. भारतीय देशांतर्गत प्रणालीमध्ये पूर्वी राज्य स्तरावर २३ वर्षांखालील संघ होते, परंतु नंतर त्यात बदल करून ते २५ वर्षांखालील संघ करण्यात आले आहेत.
या श्रेणीमध्ये आधीपासूनच अनेक दावेदार आहेत. उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय १९ वर्षाखालील संघाने २०१९ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता. परंतु संधी न मिळाल्याने त्याने देश सोडण्याचा निर्णय घेतला होता.
बीसीसीयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला म्हटले की, “एनसीए भविष्यात ५ स्तरीय प्रणालीवर काम करू शकते. ज्यामध्ये अंडर १६, अंडर १९, (एमर्जिग) अंडर २३, इंडिया ए यांचा समावेश आहे. यामध्ये आता अंडर १९ प्लसचा समावेश करण्यात येऊ शकतो. ज्यामध्ये या सर्व खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या :
हैदराबादला रोखून मोहन बागान ‘टॉप फोर’मध्ये परतण्यास उत्सुक
राहुल द्रविड स्वतः गोलंदाजी करण्यासाठी उतरला मैदानात, बीसीसीआयने अशी उडवली खिल्ली
कोलकाता ते कानपुर व्हाया मद्रास, तब्बल ३७ वर्षांपासून कायम आहे अझरुद्दीन यांचा ‘हा’ विश्वविक्रम