टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्ण इतिहास रचल्यानंतर भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा दीर्घ विश्रांतीनंतर मैदानात परतला आहे. नीरजने बुधवारपासून (२० ऑक्टोबर) आपला सराव सुरू केला आहे. सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करताना नीरजने माहिती दिली.
ऑलिम्पिक स्पर्धेत ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. ऑगस्ट महिन्यात त्याने जपानची राजधानी टोकियोत खेळल्या गेलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत हा पराक्रम केला होता. टोकियोहून परतल्यानंतर नीरज काही काळ विश्रांतीवर होता. आता तो पुन्हा मैदानावर परतला आहे.
त्याच्या व्यायामाचा एक फोटो ट्विट करत नीरजने लिहिले, ‘मी या आठवड्यात पूर्वीसारखीच विजयाची भूक आणि इच्छा घेऊन परतलो आहे. गेल्या ऑलिम्पिक प्रमाणेच सरावास प्रारंभ करणे चांगले ठरेल. तुमच्या संदेशांसाठी सर्वांचे आभार.’
टोकियो ऑलम्पिक मधील यशाने नीरजला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्याच्या या यशानंतर त्याला खुप साऱ्या जाहिराती मिळाल्या. बऱ्याच मोठ्या ब्रँडसाठी त्याने फोटोशूट देखील केले होते. यासोबतच त्याने आपला काही काळ मालदीव आणि दुबई येथे व्यतीत केला.
Returned to training this week with the same hunger and desire as before. A #throwback to the beginning of the last Olympic cycle is a good place to start! Thank you to everyone for your messages of support. ???????? pic.twitter.com/gia4fP4SQD
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) October 20, 2021
भारताला ऍथलेटिक्समध्ये आतापर्यंत एकही ऑलिम्पिक पदक मिळाले नव्हते. दोन वेळा भारत ऑलिम्पिक स्पर्धेत ऍथलेटिक्समध्ये पदक जिंकण्यात चुकला होता. मिल्खा सिंग यांचे रोम ऑलिम्पिकमध्ये अगदी थोडक्यात पदक हुकले होते. त्याचवेळी, ३७ वर्षांपूर्वी, पीटी उषाने अगदी थोडक्यात पदक गमावले होते आणि चौथे स्थान मिळवले होते.
पण नीरजने यंदा भारतीय ऍथलेटिक्समध्ये पराक्रम गाजवला आणि ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. त्याने टोकियोमध्ये ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले आणि इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी नेमबाज अभिनव बिंद्राने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले होते. नीरजच्या या यशाने भालाफेकसारख्या खेळांना नवे आयाम मिळाले आहे.
नीरजच्या ऐतिहासिक यशासोबतच भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्येही सर्वोत्तम कामगिरी केली. या ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताने एकूण सात पदके जिंकली होती. जी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी भारताने लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये सहा पदके जिंकली होती. भारताने टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत चार कांस्य, दोन रौप्य आणि एक सुवर्णपदक जिंकले आहे. यावेळी भारताने हॉकीमध्येही कांस्यपदक जिंकले, जे चार दशकांनंतर हॉकीतील भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक ठरले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आर्चर, स्टोक्स टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी नसणे लाजिरवाणे’, इंग्लंडच्या फलंदाजाचे मोठे वक्तव्य
टी२० विश्वचषकातील आतापर्यंतचे शतकवीर; केवळ एका भारतीयाचा समावेश
कपिल देव यांच्या हेअर स्टाईलवर दोनवेळचा विश्वविजेेता कर्णधार झाला फिदा! दिली ‘अशी’ प्रतिक्रिया