बंगळुरु। आज(25 ऑक्टोबर) तमिळनाडू विरुद्ध कर्नाटक संघात विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्यात कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाला योग्य ठरवत कर्नाटकने सुरुवातही चांगली केली. कर्नाटककडून अभिमन्यू मिथूनने तमिळनाडूचा सलमावीर फलंदाज मुरली विजयला पहिल्याच षटकात 0 शून्य धावेवर बाद केले. पण तो बाद झाल्यानंतर तमिळनाडूकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आर अश्विनला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
अश्विनचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला व्हिडिओ बीसीसीआयनेही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘ओळखा कोण आहे जो विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला चालला आहे?’
Guess who's walking out to bat at No.3 in the Vijay Hazare Trophy final? @ashwinravi99???? #KARvTN @Paytm #VijayHazare pic.twitter.com/1nrhVZQs2R
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 25, 2019
मात्र अश्विनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची तमिळनाडू संघाची ही चाल यशस्वी झाली नाही. अश्विनला व्ही कौशिकने 8 धावांवर बाद केले. त्यामुळे तमिळनाडूला 8 षटकांच्या आतच दुसरा धक्का बसला.
पण त्यानंतर अभिनव मुकुंद आणि बाबा अपराजितने तमिळनाडूचा डाव सावरला असून त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 124 धावांची शतकी भागीदारीही केली आहे. या दोघांचेही अर्धशतक पूर्ण झाले आहे. पण अभिनव 85 धावा करुन बाद झाला.