मोठा गाजावाजा करून ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघ पहिल्याच सामन्यात तोंडावर आपटला. अवघ्या अडीच दिवसात भारताचे पानिपत झाले. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत नीचांकी धावसंख्या (३६) विराट कोहलीच्या संघाने नोंदवली. आजी-माजी खेळाडूंसह क्रिकेटचाहते ही या पराभवाने व्यथित झाले आहेत. सर्वजण खराब कामगिरीसाठी भारतीय खेळाडूंना लक्ष करत असताना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सहाय्यक प्रशिक्षकांना प्रश्न विचारणे आता गरजेचे झाले आहे.
भारतीय उपखंड आणि सेना देशांतील कामगिरीतील तफावत
सध्याचे भारतीय संघाचे कसोटी क्रमवारीतील स्थान आहे तिसरे. मागील अनेक वर्ष भारतीय संघ कसोटीत अव्वल स्थानी होता. सर्वोत्कृष्ट कसोटी संघाला दरवर्षी देण्यात येणारी गदा भारतीय संघाकडे होती. मात्र, ही गदा वारंवार भारतीय संघाकडे येण्याचे कारण होते मायदेशातील आणि भारतीय उपखंडातील संघाची कामगिरी. भारतीय उपखंडाबाहेर आपला संघ कायम माती खातो हे निर्विवाद सत्य आहे.
भारतीय संघाला विदेशी भूमीवर २०११ इंग्लंड दौऱ्यापासून आपण मार खाताना पाहतोय. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने एकाच वर्षात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सलग ८ कसोटी गमावण्याची लाजिरवाणी कामगिरी करून दाखवली. २०१४ मध्येही परिस्थितीत फारसा काही फरक पडला नाही. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडमध्ये तर एक कसोटी विजय मिळवणै देखील डोंगर फोडण्यासारखे काम होऊन बसले आहे. हा, नाही म्हणायला आपण वेस्ट इंडीजमध्ये जाऊन चार वेळा मालिका विजय साजरा करून आलो आहोत. २०१८-२०१९ ला ऑस्ट्रेलियात मिळवलेला कसोटी मालिका विजयही एक अपवादच. पण, सेना कंट्रींजमध्ये ( SENA Countries) दैदिप्यमान म्हणावे असे यश कधी लाभलेच नाही.
सपोर्ट स्टाफ काय करतोय?
आज (१९ डिसेंबर) ऍडलेडमध्ये जे काही झाले, त्याचे खापर फलंदाजांच्या माथी मारून, संघात काहीतरी बदल करण्याचे सुचवून सर्वजण पुढील सामन्यावेळी जुन्याच जोशाने टीव्हीसमोर बसतील. मात्र, या अशा लज्जास्पद पराभवानंतर खरंतर संघ व्यवस्थापनाला पुढे येऊन अशा पराभवांची जबाबदारी घ्यावी लागेल. भारताचा सध्याचा प्रशिक्षक वर्ग कमालीचा अनुभवी आहे. रवी शास्त्री हे २०१४ पासून संघासोबत आहेत (कुंबळे यांचा एक वर्षाचा कालावधी सोडून), गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर हेदेखील २०१३-२०१४ च्या दरम्यान भारतीय संघासोबत जोडले गेले.
भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यशाचे श्रेय अनेकदा अरुण यांना दिले जाते. परंतु, याच भारतीय गोलंदाजांसमोर जेव्हा विरोधी शेपूट वळवळते तेव्हा मात्र, अरुण उत्तरदायी नाहीत का? मागील सहा वर्षाच्या काळात भारताने सॅम करन, पॅट कमिन्स, नॅथन लायन, मिचेल स्टार्क, नील वॅग्नर, कायले जेमीसन या अस्सल गोलंदाजांना अष्टपैलू खेळाडू बनण्यास मदत केली आहे. भारताचे सध्याचे वेगवान गोलंदाजी आक्रमण सर्वोत्कृष्ट आहे यात कसलाही वाद नाही. मात्र, काहीतरी उणीव दरवेळी राहते हे स्पष्टपणे दिसतेय. ऍडलेड कसोटीच्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ही ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १११-७ अशी असताना त्यांचा डाव अखेरीस १९१ धावांवर संपुष्टात आला होता. तो १५१ धावांवर का नाही संपला?
सध्याचा टी२० जमान्यात जगातील सर्वात संघांचे क्षेत्ररक्षण कमालीचे सुधारले आहे. डझनभर टी२० लीग व नवनव्या तंत्रज्ञानामुळे खेळाडू अधिकच फिट राहत आहेत. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षणही नक्कीच उत्कृष्ट आहे. मात्र, याच कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय क्षेत्ररक्षकांनी मार्नस लॅब्युशेन व टीम पेन यांचे मिळून ६ झेल सोडले. स्वतः विराट कोहली काही शानदार झेल पकडतो तर काही अगदी सोपे झेल सोडतो. याठिकाणी, जोंटी रोड्स यांना डावलून पुनश्च भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षण झालेले आर. श्रीधर काय करतात? हा प्रश्न समोर येणे साहजिक आहे.
बांगर यांना बळीचा बकरा बनवले होते का?
इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ वनडे विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारतीय संघाची आघाडीची फळी ४५ मिनिटात ढेर झाली होती. त्यावेळी, त्या प्रदर्शनाची जबाबदारी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यावर टाकून त्यांना आपल्या पदावरून दूर केले गेले. त्यांच्या जागी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी निवडसमिती सदस्य विक्रम राठोड यांची नियुक्ती केली गेली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ न्यूझीलंडमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चार व आज संपलेल्या ऍडलेड कसोटीच्या दोन्ही डावात अशा सलग सहा डावात २५० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. अशावेळी, बांगर यांच्यासाठी लावलेले मापदंड कुठे गेले?
मोठ्या स्पर्धा जिंकण्यात भारताला येतेय अपयश
रवी शास्त्री, भरत अरुण आणि आर श्रीधर हे त्रिकुट सहा-सात वर्ष भारतीय संघाचा अविभाज्य घटक आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये जिंकलेली २०१८-२०१९ बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या तिघांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश आहे. २०१४ पासून भारतीय संघ टी२० विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन स्पर्धांमध्ये मिळून तीन उपांत्य सामने आणि दोन अंतिम सामने खेळला. दुर्दैवाने यापैकी कोणत्याही स्पर्धेची ट्रॉफी भारतीय संघ उंचावू शकला नाही.
देशी-देशी म्हणून प्रत्येक वेळी करारात वाढ करूनही संबंधित व्यक्तींकडून रिझल्ट मिळत नसेल तर, चांगले रिझल्ट्स देणारे जॉन राईट, गॅरी कर्स्टन आणि डंकन फ्लेचर यांच्यासारखे विदेशी प्रशिक्षक कधीकधी भारतीय संघासाठी व भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी गरजेचे वाटतात.
महत्वाच्या बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– टीम इंडियाचा लाजीरवाणा पराक्रम आणि माजी खेळाडूंच्या तिखट प्रतिक्रिया, चाहत्यांकडूनही मीम्सचा भडीमार
– अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है! टीम इंडियाच्या वाईट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस