भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदावरून नुकतेच निवृत्त झालेले रवी शास्त्री सध्या विविध मुद्यांवर भाष्य करत असल्याने चर्चेत आहेत. रवी शास्त्री नुकतेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल उघडपणे बोलले. शास्त्री आणि गांगुली यांच्यातील कटुता २०१७ मध्ये समोर आली होती. प्रशिक्षक पदावरून पायउतार झाल्यानंतर अनिल कुंबळे यांच्या जागी रवी शास्त्री यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते.
रवी शास्त्री म्हणाले की, मी आणि गांगुली आता या वादापासून खूप पुढे गेलो असून, चांगले मित्र आहोत. २०१७ मध्ये जेव्हा रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले तेव्हा अनेकांना वाटले की विराट कोहलीशी जवळीक असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले शास्त्री म्हणाले की, या मुद्द्यावर मी भाष्य करू इच्छित नाही कारण संघाची सर्व प्रकारामधील स्थिती भारतीय संघाची कामगिरी सांगते.
सौरव गांगुली आणि आपल्या नात्यावर रवी शास्त्री पुढे म्हणाले, “आम्ही मित्र आहोत. असे नाही की आम्ही रोज एकमेकांशी गोट्या गोट्या खेळतो पण एकमेकांमध्ये खूप आदर आहे. जे झाले ते होऊन गेले. जेव्हा तुमचा क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये ७० टक्के विजयाचा विक्रम असतो, तेव्हा तुम्हाला कोणालाही उत्तर देण्याची गरज वाटत नाही. आपल्याला फक्त शांत राहण्याची, शांतपणे बसण्याची आवश्यकता असते. मात्र, या प्रकरणातील तथ्य बाहेर आले आहे.”
भारतीय संघ आता राहुल द्रविडच्या देखरेखीखाली काम करणार आहे. राहुल द्रविडची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेपासून तो संघासोबत असेल.
दरम्यान, शास्त्री म्हणाले की, भारतीय क्रिकेट प्रशासनाने भविष्यातील वेळापत्रकाबाबत थोडे चांगले नियोजन करावे. त्याच वेळी निवड प्रक्रियेतही सुधारणा करणे आवश्यक आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २०२१ च्या टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही होत आहे.