आयपीएल 2021 मधील सहाव्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने या मोसमातील आपला सलग दुसरा विजय नोंदवला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध या झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या आरसीबी संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 149 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या हैदराबाद संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 143 धावा करता आल्या आणि आरसीबीने 6 धावांनी बाजी मारली.
या मोसमात झालेल्या सलग दुसर्या विजयानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत आपल्या या विजयाचे श्रेय संघातील दोन खेळाडूंना दिले आहे.
पत्रकार परिषदेत विराट कोहली म्हणाला की, “मला संघाबद्दल अभिमान वाटत असून हा सामना आमच्यासाठी खूप शानदार होता. येत्या काही दिवसांत क्रिकेट आणखी आव्हानात्मक होणार आहे. आपण मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यातही हे पाहिले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कधीही सामन्यातून बाहेर नसता. तसेच आमच्याकडे गोलंदाजीमध्ये बरेच पर्याय असून याचा आम्हाला मधल्या षटकांत फायदा होत आहे.”
पुढे फलंदाजीविषयी बोलताना तो म्हणाला की, “149 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. त्यामुळे मलाही खात्री होती की, विरोधी संघाला सुद्धा धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे आम्ही जिंकू शकतो. म्हणून दडपण असतानाही आम्ही रणनीती आखून चांगली कामगिरी पार पाडली. त्यामध्ये जुन्या चेंडूमुळे गोष्टी अधिकच कठीण होत गेल्या. तसेच पॉवरप्ले दरम्यान मी काही चौकार ठोकून धावसंख्या हालती ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु मला वाटते की, मॅक्सवेलच्या खेळीने खूप मोठे योगदान दिले.”
शेवटी, हर्षल पटेल आणि संघाच्या रणनीतीवर बोलताना विराट म्हणाला की, “दिल्ली कॅपिटल्स संघातील हर्षल पटेलला आपल्या ताफ्यात सामील करून त्याच्यावर आम्ही एक जबाबदारी दिली आणि त्याने ती पारही पाडली. सध्या आम्ही एका वेळी फक्त एका सामन्याबद्दल विचार करत असतो आणि एकमेकांसोबत खेळण्याचा आनंदही घेत असतो. त्यामुळे आता आपल्याला फक्त प्रोफेशनल होऊन मैदानात चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
शानदार विजयानंतर कॅप्टन कोहलीच्या आनंदावर विरजण, ‘त्या’ असभ्य कृतीमुळे सामना रेफरींनी फटकारले
हैदराबादचा पराभव झाला असला तरी अर्धशतकी खेळी करणाऱ्या वॉर्नरचा मोठा विक्रम; रोहित, धवनला टाकले मागे
मला राग येतोय! आऊट होऊन मैदानातून बाहेर जाताना विराटचा चढला पारा, मग केले असे काही; व्हिडिओ व्हायरल