हैद्राबाद । गेले ५ दिवस सुरु असलेल्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. कधी नाही ते पहिल्यांदा या राष्ट्रीय स्पर्धेची एवढी मोठी चर्चा झाली. पहिल्यांदाच ही स्पर्धा प्रेक्षकांच्या आग्रहाखातर थेट प्रक्षेपित करण्यात आली. हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे ही स्पर्धा अतिशय थाटामाटात पार पडत आहे.
महाराष्ट्राच्या महिलांच्या संघाला जरी अंतिम ४ संघात स्थान मिळवण्यात अपयश आले असले तरी पुरुषांच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस असून महिला आणि पुरुष संघांचे असे मिळून ६ सामने होणार आहे.
महिलांच्या उपांत्यफेरीचे सामने आज सकाळी १० आणि ११ वाजता पार पडले. पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात रेल्वेने पंजाब संघाचा ३०-२३ असा पराभव केला. हा पराभव करताना दोन्ही संघ पूर्वार्धात १०-१० असे बरोबरीत होते. त्यामुळे ६५व्या महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात प्रवेश करणारा रेल्वे पहिला संघ बनला.
दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात हिमाचल प्रदेशने हरियाणाचा ३०-२६ असा पराभव केला. पूर्वार्धात हरियाणा १८-१२ असा आघाडीवर होता. परंतु ही आघाडी भरून काढत हिमाचल प्रदेशने ४ गुणांनी विजय मिळवला.
अंतिम फेरीचा सामना दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी होणार असून हिमाचल प्रदेश विरुद्ध रेल्वे असा होणार आहे.