आयपीएल २०२१ चा हंगाम कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २९ सामन्यानंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. स्पर्धा ऐन भरात आली असताना खेळाडूंना आपल्या घरी परतावे लागले. सध्याच्या परिस्थितीत अनेक खेळाडू घरीच सराव करत आहेत. तसेच फावल्या वेळेत अनेक वृत्तवाहिन्यांना किंवा संकेतस्थळांना मुलाखती देताना दिसतायेत. याच दरम्यान भारतीय संघाचा फिरकीपटू व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणारा जयंत यादव याने आपला आयपीएलमधील कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले.
जयंतने केले रोहितचे कौतुक
दोन वर्षा पासून मुंबई इंडियन्सचा सदस्य असलेल्या जयंत यादवने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कर्णधार रोहित शर्माचे तोंडभरून कौतुक केले. जयंतने त्याच्या नेतृत्वाबद्दल बोलताना म्हटले, “खेळ समजून घेण्यात रोहित एकदम निपून आहे. येणाऱ्या षटकांमध्ये काय घडणार याबाबत त्याला आधीच माहिती असते. रोहित खेळाडूंना उत्तमप्रकारे समजून सांगतो. खेळाडूंकडून त्याला काय अपेक्षा आहेत व सामन्यात त्याचा वापर कसा होणार आहे हे माहीत असल्याने खेळाडू उत्तम कामगिरी करतात. मी त्याला कधीही रागवताना पाहिले नाही. तो नेहमी शांत असतो. हीच एका चांगल्या खेळाडूची निशाणी आहे.”
जयंत यादवने २०२१ आयपीएलमध्ये तीन सामने खेळताना केवळ एकच बळी मिळवला. मात्र, त्यांनी फलंदाजांना फटकेबाजी करण्याची मुभा दिली नाही.
सर्वात यशस्वी कर्णधार आहे रोहित
रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० अशी पाच वर्ष आयपीएल विजेतेपदे पटकावली आहेत. याचबरोबर रोहित भारतीय संघाचा उपकर्णधार देखील आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत निदहास ट्रॉफी व २०१८ आशिया कप मध्ये त्याने भारताचे नेतृत्व करताना संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
बाद झाल्यावर विराटने दिलेली ‘ही’ प्रतिक्रिया, आवेश खानने केला खुलासा
हे जरा नवीनच! ‘ही’ महिला क्रिकेटपटू होती ब्राव्होची मोठी चाहती, सगळीकडे लिहीत असत ४७ जर्सी नंबर