दिग्गज भारतीय कर्णधार एमएस धोनी व क्रिकेटविश्वातील सध्याचा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली यांना बाद करणे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. काही खेळाडू आपल्या संपुर्ण कारकिर्दीत ही या खेळाडूंना बाद करू शकले नाहीत. मात्र, आयपीएलमध्ये या खेळाडूंना बाद करण्याची संधी अनेक युवा भारतीय गोलंदाजांकडे असते. नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएल २०२१ मध्ये युवा वेगवान गोलंदाज आवेश खान याने या दोन्ही दिग्गजांना बाद करण्याची किमया करून दाखवली. विराट कोहलीला बाद केल्यानंतर, विराट आपल्याला काय म्हणाला हे आता आवेशने उघड केले आहे.
आवेशने उडवला होता दोघांचाही त्रिफळा
आयपीएल २०२१ मधील दुसऱ्या सामन्यात आवेश खानने चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध धोनीला दुसऱ्याच चेंडूवर खातेही न खोलता त्रिफळाचीत केले होते. त्यानंतर, स्पर्धेतील २२ व्या सामन्यात आवेशने विराटला देखील बाद केले होते.
विराट म्हणाला ही गोष्ट
एका क्रिकेटसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना धोनी व विराट कोहली यांना बाद केल्यावर काय वाटले याविषयी बोलताना आवेश म्हणाला, “ते दोघे देखील या खेळाचे दिग्गज आहेत. माझ्यासारख्या युवा खेळाडूला त्या दोघांना बाद करणे म्हणजे एका आनंददायी क्षणासारखे होते. विराटला बाद केल्यानंतर तो मला म्हणाला चांगली गोलंदाजी केलीस. अशीच कामगिरी करत रहा.”
आवेश खान आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा भाग आहे. या हंगामात त्याने ८ सामने खेळताना १४ बळी मिळवले आहेत. आवेश यापूर्वी २०१७ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता.
अशी आहे आयपीएल कारकीर्द
मध्यप्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणारा आवेश २०१६ सालच्या टी२० विश्वचषकापासून चर्चेत आला होता. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १७ सामने खेळताना १९ बळी आपल्या नावे केले आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनोमी रेट ८.८३ असा असून, ३२ धावा देत ३ बळी मिळवण्याची त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हे जरा नवीनच! ‘ही’ महिला क्रिकेटपटू होती ब्राव्होची मोठी चाहती, सगळीकडे लिहीत असत ४७ जर्सी नंबर
इंग्लंड दौरा ‘कर्णधार’ विराट कोहलीसाठी ठरणार लाभदायी; ‘हे’ ३ मोठे विक्रम करु शकतो नावावर