काही दिवसांपूर्वी यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत करत आयपीएल इतिहासातील चौथे जेतेपद मिळवले. चेन्नई सुपर किंग्स संघाला जेतेपद मिळवून देण्यात ऋतुराज गायकवाडने मोलाचे योगदान दिले. त्याने धावांचा डोंगर उभारत ऑरेंज कॅप पटकावली. आता हीच कामगिरी त्याने सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत देखील सुरू ठेवली आहे.
रविवारी (७ नोव्हेंबर) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र आणि ओडिसा हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना १८३ धावांचा डोंगर उभारला होता. ज्यामध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने तुफानी खेळी करत ४७ चेंडूंमध्ये ८१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले होते. या तुफानी खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने २७ धावांनी विजय मिळवला. मुख्य बाब म्हणजे ही ऋतुराज गायकवाडची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत अर्धशतकांची हॅटट्रिक आहे.
ऋतुराज गायकवाडने यापूर्वी पंजाब आणि तामिळनाडू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील तुफानी अर्धशतक झळकावले होते. त्याने तामिळनाडू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ५१ धावांची खेळी केली होती. परंतु ही खेळी व्यर्थ गेली होती. कारण महाराष्ट्र संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पंजाब संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ८० धावांची खेळी करत महाराष्ट्र संघाला जोरदार विजय मिळवून दिला होता.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, महाराष्ट्र संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. तर केदार जाधवने ५५ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाला २० षटक अखेर ८ बाद १८३ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना ओडिसा संघाकडून अंशुमन रथने सर्वाधिक ३४ तर अभिषेक राऊतने २९ धावांचे योगदान दिले. परंतु ओडिसा संघाचा डाव अवघ्या १५६ धावांवर संपुष्टात आला. ज्यामुळे महाराष्ट्र संघाने हा सामना २७ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
संपूर्ण स्पर्धा गाजवून नॉकआऊट सामन्यात न्यूझीलंड ठरलाय फेल, विराटसेनेचं सेमीफायनल गाठणं निश्चित!
न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान सामना टाय किंवा अनिर्णीत राहिल्यास काय? घ्या जाणून गणिते
टी२० विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार भावूक; म्हणाला, ‘एका युगाचा अंत झाला’