भारताने चौथ्यांदा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून नव्याने इतिहास लिहिला आहे. पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सने पराभूत करत ह्या विश्वचषकावर आपले नाव कोरले.
या विश्वचषकात अनेक विक्रम झाले. ते असे-
-भारताने २००२, २००८, २०१२ आणि २०१८ या वर्षी १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला आहे. आजपर्यंत कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नाही.
-भारताकडून कोणत्याही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा मनजोत कार्ला दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने आज नाबाद १०१ धावा केल्या. या यादीत अव्वल स्थानी उन्मुक्त चंद असून त्याने २०१२ साली नाबाद १११ धावा केल्या होत्या तर तिसऱ्या स्थानी गौतम गंभीर असून मुंबईत झालेल्या विश्वचषकात त्याने ९७ धावा केल्या होत्या.
-मोहम्मद कैफ (२०००), विराट कोहली (२००८), उन्मुक्त चंद (२०१२) आणि पृथ्वी शॉ (२०१८) यांनी भारताला आजपर्यंत १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून दिला आहे.
-क्रिकेट विश्वचषक जिंकणारा पृथ्वी शॉ हा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने १८ वर्ष आणि ८६ दिवसांचा असताना ही कामगिरी केली आहे. यापूर्वी मिचेल मार्शने २०१०मध्ये १८ वर्ष आणि १०२ दिवसांचा असताना ही कामगिरी केली होती.
-भारतीय संघाने आजपर्यंत ६ अंतिम फेरीचे सामने १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात खेळले असून त्यात ४ विजेतेपद मिळवली आहेत.
-कर्णधार म्हणून युवकांच्या क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉने ११ पैकी ११ सामने जिंकत कर्णधार कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
-भारतीय संघाने दुसऱ्यांदा ऑस्टेलिया संघाला अंतिम सामन्यात पराभूत करत विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी २०१२ साली उन्मुक्त चंदच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.
-भारतीय खेळाडू १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात मालिकावीर ठरण्याची १० विश्वचषकात चौथी वेळ. युवराज सिंग(२०००), शिखर धवन(२००४), चेतेश्वर पुजारा(२००६) आणि शुभमन गिल(२०१८)