आयसीसीने प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान एजबॅस्टन येथे १८ ते २२ जून या कालावधीत खेळला जाईल. अंतिम सामना जवळ आला असतानाच इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने या स्पर्धेविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
ब्रॉडने केलेले मोठे वक्तव्य
जेम्स अँडरसननंतर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात अनुभवी गोलंदाज असलेला स्टुअर्ट ब्रॉड याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या एकूण प्रारूपाविषयी मोठे वक्तव्य केले. ब्रॉड म्हणाला, “जागतिक कसोटी चॅम्पियनशिप ही एक उत्कृष्ट संकल्पना आहे. मात्र, या स्पर्धेची गुणांकन पद्धत तितकीशी चांगली नाही. मला हेच समजेना की, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणारी पाच सामन्यांची ऍशेस मालिका, भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या दोन सामन्यांच्या मालिकेच्या बरोबरीची कशी असू शकते? सुरुवात चांगली आहे मात्र, यावर तांत्रिकदृष्ट्या खूप काम करावे लागेल.”
ब्रॉडने हेदेखील मान्य केली की, सध्याच्या गुणांकन पद्धतीनुसार इंग्लंड जितके सामने खेळतो त्यामुळे स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकत नव्हता.
अशी आहे गुणांकन पद्धत
आयसीसीने सुरू केलेल्या या जागतिक गुणांकन पद्धतीनुसार एका मालिकेत १२० गुण वाटले जातात. दोन सामन्यांची मालिका असेल तर, प्रत्येक सामन्यात विजयी संघास ६० गुण देण्याची पद्धत आहे. अशाप्रकारे जितक्या सामन्यांची मालिका असेल त्याप्रकारे हे गुण वाटुन घेतले जातात.
जागतिक कसोटी सामन्याच्या अखेरच्या गुणतालिकेनुसार भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर राहिला. न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यानंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी राहिले.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौरा या तीन खेळाडूंसाठी ठरू शकतो अखेरची संधी
ऑस्ट्रेलियन संस्कृतीतून ही गोष्ट शिकून द्रविडने भारतात खेळाडू घडवले, ग्रेग चॅपेल यांचे विधान
कसोटी क्रमवारीत भारताने कायम राखले अव्वल स्थान, या संघांची झाली घसरण