ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वाॅर्न (Shane Warne) याचा शुक्रवारी (०४ मार्च) मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूने सगळीकडे दु:ख व्यक्त केले जात आहे. त्याच्या मृत्यूनंतर भारतातून सुद्धा दु:ख व्यक्त केले जात आहे. आता यावर भारताचे दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मत मांडले आहे. सुनील गावसकर म्हणाले की, त्यांच्या नजरेत वाॅर्न हा महान खेळाडू नाही. भारताविरुद्ध त्याची कामगिरी साधारण आहे. त्यांच्या नजरेत श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) वाॅर्नपेक्षा पुढे आहे.
सुनील गावसकरांचे हे व्यक्तव्य ऑस्ट्रेलियन माध्यमांना पटलेले नाही आणि त्यामुळे माध्यमे त्याच्यावर भडकली आहेत. ऑस्ट्रेलिया माध्यमांनी म्हटले आहे की, “सुनील गावसकर यांचे हे मत असू शकते की, वाॅर्न त्यांच्यासाठी महान नसतील, परंतु कमीत कमी ही गोष्ट त्यांनी बोलायला नको होती आणि जग त्यांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त करत असताना त्यांनी त्यांचे मत मांडायला नको होते.”
शेन वाॅर्नच्या मृत्यूनंतर भारताचे माजी फलंंदाज सुनील गावसकर जेव्हा माध्यमांशी बोलत होते, तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारले गेले. त्यावेळी त्यांना विचारण्यात आले की, तुमच्या मते वाॅर्न हे महान गोलंदाजांपैकी एक होते का? त्यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वजण भडकले आहेत. गावसकर म्हणाले होते की, “नाही मी असे म्हणत नाही. माझ्यासाठी भारतीय फिरकी गोलंदाज आणि मुथय्या मुरलीधरन शेन वाॅर्नपेक्षा चांगला आहे. भारताविरुद्ध शेन वाॅर्नची आकडेवारी खूप साधारण आहे.”
भारताचे माजी कर्णधार गावसकर पुढे म्हणाले की, “भारताविरुद्ध त्याने एकावेळी ५ विकेट घेतल्या आहेत, त्या नागपूर कसोटीमध्ये मिळाल्या होत्या. त्याने पाचवी विकेट झहीर खानची घेतली होती. तो आक्रमक फलंदाजी करत होता. कारण, त्याला भारतीय फलंदाजी विरुद्ध जास्त यश मिळाले नव्हते. तो फिरकी गोलंदाजीसाठी खूप चांगला खेळाडू आहे. त्यामुळे मी असे समजत नाही की, तो महान खेळाडू आहे.”
“मुथय्या मुरलीधरनचा भारताविरुद्ध विक्रम चांगला आहे. त्यामुळे माझ्या मते तो वाॅर्नपेक्षा उत्तम फिरकीपटू आहे,” असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये १४५ सामने खेळताना २७३ डावात २.६५ च्या इकॉनॉमी रेटने ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातील दुसरा गोलंदाज आहे. असा कारनामा मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने कसोटीत एकूण ८०० विकेट्स घेतल्या आहेत.