गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा काढणारा सूर्यकुमार अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या संधीच्या प्रतिक्षेत होता. २०२० साली युएईत झालेल्या आयपीएलमध्ये धावांचा रतीब घातल्यानंतरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. या निर्णयासाठी निवड समितीवर चाहत्यांनी तसेच आजी-माजी खेळाडूंनी कडवी टीकाही केली होती. मात्र, अखेर यावर्षाच्या सुरुवातीला त्याची प्रतिक्षा संपली आणि त्याने भारतीय संघात पदार्पण केले.
पदार्पणानंतर त्याने त्याच्यातील प्रतिभेची चुणूकही दाखवली. त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पदार्पणाच्या टी२० सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. मात्र त्यानंतरच्या सामन्यात त्याला रोहित शर्मा बाद झाल्यावर तिसर्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याचे सोने करत त्याने ३० चेंडूत ५७ धावांची बहारदार खेळी साकारली. यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पणही केले.
पुढे तो टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी भारतीय संघात देखील स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे वर्ष सूर्यकुमारसाठी स्वप्नपूर्ती करणारे ठरले. यानंतर आपल्या मिळालेल्या संधींचे नाणे खणखणीत वाजवत तो भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू बनला आहे. आज (१४ सप्टेंबर) याच सूर्यकुमारचा ३२ वा वाढदिवस.
याच वाढदिवसाच्या निमित्ताने या लेखात आपण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकूया…
दिलीप वेंगसरकरांच्या अकादमीतून केली क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात
मूळचे उत्तर प्रदेशच्या गाझीपुरचे असलेले अशोककुमार हे मुंबईतील भाभा अणूउर्जा प्रकल्पात अभियंता म्हणून काम करतात. उत्तर प्रदेशचे असले तरी, अनेक वर्षे मुंबईत राहत असल्याने ते पक्के मुंबईकर झाले. अशोक कुमार यांनी अगदी लहान वयात आपला मुलगा सुर्यकुमारमधील क्रिकेटची प्रतिभा ओळखली. चेंबूर येथील बीएआरसी कॉलीनीत झालेल्या शिबिरात त्याने सर्व प्रथम आपला सहभाग नोंदवला.
सुरुवातीला तो अशोक सावळकर यांच्या अकादमीत प्रशिक्षण घ्यायचा. पुढे, सुर्यकुमार बाराव्या वर्षी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या एल्फ-वेंगसरकर अकादमीत क्रिकेट प्रशिक्षणासाठी दाखल झाला. क्लबसाठी चांगली कामगिरी केल्याने, त्याची निवड मुंबईच्या वयोगट संघांसाठी होत गेली.
मुंबई रणजी संघाच्या कर्णधारपदापर्यंत मारली मजल
सूर्यकुमारची २००९ विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी मुंबईच्या वरिष्ठ संघात पहिल्यांदा निवड झाली. त्या स्पर्धेतील कामगिरीने त्याने सर्वांना प्रभावित केले. पाठोपाठ, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीसुद्धा तो मुंबईच्या संघात समाविष्ट झाला. २०१० मध्ये दिल्ली विरुद्ध रणजी ट्रॉफीतून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले. त्यानंतर, मुंबईसाठी तो सर्वात महत्त्वाचा फलंदाज बनत गेला. २०११-२०१२ च्या हंगामात तेवीस वर्षाखालील संघाकडून त्याने एक हजाराहून जास्त धावा चोपल्या. सूर्यकुमारच्या बॅटमधून सातत्याने धावा निघत होत्या. परिणामी, २०१४ रणजी हंगामासाठी मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सुर्यकुमारच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती.
केकेआरसाठी केली अफलातून कामगिरी
देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या प्रदर्शनामुळे २०१२ आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात निवडले. मात्र, त्यावेळी मुंबईच्या संघात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अंबाती रायडू यांच्यासारखे भारतीय फलंदाज असल्याने, त्याला फक्त एक सामना खेळण्यासाठी मिळाला. त्या सामन्यातही त्याची फलंदाजी आली नाही. त्यानंतर, सुर्यकुमार प्रसिद्धीझोतात आला तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना. २०१४ मध्ये तो केकेआर ताफ्यात दाखल झाला. पहिले वर्ष त्याला नियमित संधी मिळत नव्हती.
पण २०१५ आयपीएलमध्ये आपला पूर्वाश्रमीचा संघ असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध २० चेंडूत ४६ धावा काढत त्याने केकेआरला एकहाती सामना जिंकून दिला. केकेआरसाठी सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत, त्याने सातत्याने वेगवान २०-३० धावा काढून अनेक विजय मिळवून दिले. केकेआर संघ व्यवस्थापनाने २०१६ व २०१७ अशी दोन वर्ष त्याला उपकर्णधारपद देत त्याच्यावर विश्वास दाखवला.
मुंबई इंडियन्सच्या विजयाची गॅरंटी
सुर्यकुमार २०१८ आयपीएलवेळी करोडपती बनला. सुर्यकुमारला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, कोलकता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात जबरदस्त चुरस रंगली. अखेरीस, मुंबई इंडियन्सने त्याला ३.२० कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले.
केकेआरसाठी फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या सूर्यकुमारला मुंबईने आघाडीच्या फळीची जबाबदारी दिली. सुर्यकुमारने आपल्यावरील विश्वासाला तडा न जाऊ देता हंगामात ५१२ धावा फटकावल्या. त्या हंगामात त्याने मुंबईकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. २०१९ आयपीएलमध्ये मुंबईला आपले चौथे विजेतेपद मिळवून देण्यात सुर्यकुमारने ४२४ धावा काढत महत्त्वाचे योगदान दिले. आयपीएल २०२० मध्येही त्याने ४८० धावा फटकावत मुंबईच्या पाचव्या आयपीएल विजेतेपदात महत्त्वाचे योगदान दिले.
आयपीएलमध्ये गाजवली युएईची मैदाने
युएईमध्ये पार पडलेला आयपीएलचा तेरावा हंगाम सुर्यकुमारने जवळपास आपल्या नावे केला. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असताना, सुर्यकुमारने क्विंटन डी कॉक व इशान किशनच्या साथीने मुंबईच्या फलंदाजीची धुरा वाहिली. आयपीएल दरम्यानच, आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली. या दौऱ्यासाठी सूर्यकुमारची भारतीय संघात निवड होईल; अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, त्याला संघात स्थान मिळाले नाही. यामुळे अनेक वादांना तोंड फुटले. ट्विटरवर #JusticeForSKY हा हॅशटॅग बराच काळ ट्रेडींग मध्ये राहिला.
मात्र, त्यानंतर २०२१ वर्ष त्याच्यासाठी सोन्यासारख्या संधी घेऊन उगवलं. त्याने भारताच्या टी२०, वनडे आणि कसोटी संघातही स्थान मिळवले. पण अद्याप त्याचे कसोटी पदार्पण झाले नाही, तेही तो लवकरच करण्याचा प्रयत्न करेल. पण यावर्षी त्याला टी२० विश्वचषक खेळता येणार आहे, ही या वर्षातील त्याच्यासाठी मिळालेली मोठी संधी आहे. त्यामुळे त्यानेही म्हटले की ‘स्वप्न पूर्ण होतात.’ सूर्यकुमारची गेल्या अनेक वर्षातील कामगिरी पाहिली, तर असे नक्कीच म्हणू शकतो, त्याने क्रिकेटसाठी केलेली तपश्चर्या फळाला आली आहे.
वाचा –
ब्लाॅग: १४ मार्च २००१ – असे खेळले वीर हे दोन!!!
भुतकाळात डोकावताना: ईडन गार्डन जळत होत आणि कांबळीसोबत सारा भारत रडत होता…
वेस्ट इंडीजच्या दोन टी२० विश्वचषक विजयाचा साक्षीदार, ज्याला मिळाली नाही अपेक्षेप्रमाणे संधी