२००८ च्या भारत-श्रीलंका-ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या सीबी सिरीजचे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. २००७ विश्वचषकात अपमानास्पद पराभव झाल्यानंतर, एमएस धोनी या युवा कर्णधाराच्या नेतृत्वात भारताने, त्याच वर्षी झालेला, पहिला टी२० विश्वचषक जिंकला. वर्षाखेरीस सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील, विवादित कसोटी मालिकेनंतर, सीबी सिरीजसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देत, तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली. पुन्हा एकदा, धोनीने आपल्या नेतृत्वगुणांची झलक दाखवत या मालिकेत देखील भारताला विजयी केले. याच मालिकेत, भारताला एक असा वेगवान गोलंदाज सापडला, ज्याने आपल्या धारदार स्विंगने ऑस्ट्रेलिया व श्रीलंकेच्या दिग्गज फलंदाजांना नाकीनऊ आणत, भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पुढे, पाच-सहा वर्ष भारताच्या वेगवान आक्रमणाचा प्रमुख मोहरा असलेला हा गोलंदाज होता प्रवीण कुमार.
कसोटी मालिका चुरशीची होऊन, २-१ अशा फरकाने ऑस्ट्रेलियाने जिंकली. तिन्ही संघ, मालिकेत प्रत्येकी आठ सामने खेळणार होते. मालिकेतील भारताचे पहिले दोन सामने पावसामुळे रद्द झाले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने, साखळी सामन्यात आपला जोर दाखवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सात सामन्यांपैकी, चार सामने जिंकत, अंतिम फेरीत प्रवेश जवळपास निश्चित केला. श्रीलंकेचे दोन सामने शिल्लक होते, तर भारताचा एकच सामना शिल्लक होता. अंतिम फेरीत धडक मारायची असल्यास दोन्ही संघांना, आपआपल्या सामन्यात विजय हवे होते.
मालिकेतील अकराव्या सामन्यात, भारत व श्रीलंका आमनेसामने होते. भारताचा हा अखेरचा सामना होता. श्रीसंत अचानकपणे, दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी प्रवीण कुमारला संधी मिळाली. तो याआधी मालिकेत एक सामना खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात तो एकही बळी मिळवू शकला नव्हता. निर्णायक सामन्यात, प्रवीणला पुन्हा एकदा संधी मिळाली होती.
होबार्टच्या मैदानावर, काहीश्या ढगाळ वातावरणात धोनीने नाणेफेक जिंकत, गोलंदाजीचा निर्णय घेतला. कसोटी मालिकेपासून तुफान फॉर्मात असलेल्या, ईशांत शर्माने दिलरूवान परेराला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मात्र, प्रवीण कुमारने श्रीलंकन फलंदाजांवर नामोहरम केले. जयसूर्या, संगकारा व जयवर्धने हे तीनही सर्वाधिक अनुभवी फलंदाज त्याने बाद केले. ईशांत शर्मा व प्रवीणने प्रत्येकी चार बळी मिळवत, श्रीलंकेचा डाव १७९ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात, सचिन तेंडुलकर व गौतम गंभीरच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने सहज विजय मिळवला. सामनावीर अर्थातच प्रवीण कुमार ठरला.
श्रीलंकेला पराभूत केल्याने, भारताला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले. स्पर्धेची अंतिम फेरी ‘बेस्ट ऑफ थ्री’ प्रकारे होणार होती. ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यात तीन अंतिम सामने होणार होते, ज्यातील दोन सामने जिंकणारा संघ विजयी ठरणार होता.
पहिला अंतिम सामना सिडनीचा मैदानावर आयोजित केला होता. ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिंगने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची फळी अक्षरशः नामोहरम केली. प्रवीणने गिलख्रिस्ट व पॉंटिंगला पहिल्या चार शतकातच तंबूत धाडले. ईशांत, हरभजन यांनी ऑस्ट्रेलियाची मधली फळी कापून काढली. मात्र, सलामीवीर मॅथ्यू हेडन मैदानावर उभा होता. त्याने ८२ धावांची झुंजार खेळी केली. माइक हसीने ४५ धावा काढत, ऑस्ट्रेलियाला २३९ धावांची सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. गोलंदाजांनी बजावलेल्या कामगिरीवर, भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू सचिन तेंडुलकरने नाबाद ११७ धावांचा कळस चढविला. संघातील सर्वात युवा खेळाडू रोहित शर्मा याने देखील ६६ धावांचे योगदान देत, ‘बेस्ट ऑफ थ्री’ फायनलमधील पहिली फायनल भारताच्या नावे केली.
स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी, दुसरी फायनल जिंकणे ऑस्ट्रेलियाला अनिवार्य होते. भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकत, ब्रिस्बेनच्या मैदानावर फलंदाजी करण्याचे ठरवले. संपूर्ण मालिकेत, जबाबदारी घेऊन खेळत असलेल्या सचिनने यावेळी देखील, संघाची साथ सोडली नाही. त्याने ९१ धावांची एक शानदार खेळी केली. उथप्पा, युवराज व धोनी यांनी अनुक्रमे ३०,३८ व ३६ धावा करत, भारताची धावसंख्या १५८ पर्यंत नेली.
‘करा किंवा मरा’ अशी स्थिती असलेल्या ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा, प्रवीण कुमारने तीन धक्के दिले. गिलख्रिस्ट, पॉंटिंग व क्लार्क हे त्याचे शिकार ठरले. हेडन, सायमंड्स आणि हसीने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलिया सामना जिंकेल असे वाटत असताना, भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचे जम बसलेले फलंदाज बाद केले. प्रमुख फलंदाज बाद झाले तरी, अष्टपैलू जेम्स होप्स भारताच्या आशा तोडू पाहत होता. अखेरच्या षटकापर्यंत ताणल्या गेलेल्या सामन्यात, इरफान पठाणने होप्सला बाद करत, भारताला ९ धावांनी विजय मिळवून दिला. भारताने ऑस्ट्रेलियन भूमीवर इतिहास रचला होता. एक युवा संघ ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाय पराभूत करण्यात यशस्वी झाला होता.
सांघिक कामगिरीच्या बळावर भारताने विजय मिळवला असला तरी, अखेरच्या तीन सामन्यात प्रवीण कुमारने १० बळी मिळवत सर्व क्रिकेटप्रेमी व समीक्षकांची मने जिंकली. त्यानंतर, प्रवीणने भारतीय गोलंदाजीतील एक स्तंभ म्हणून बरीच वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केली.
वाचा-
-‘बिग टॉम’ बिरुदावली लाभलेले टॉम मूडी म्हणजे ‘दर्जेदार खेळाडू आणि असामान्य प्रशिक्षक’
-गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार