इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. भारतीय संघातील सलामीचे फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकीय भागीदारीच्या जोरावर एक चांगली सुरुवात मिळवून दिली. ज्यात केएल राहुलने १२९ धावा केल्या, तर रोहितने ८३ धावा केल्या. यांच्या खेळीच्या जोरावर दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने ३६४ धावांचा आकडा गाठला.
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा या दौर्यात समावेश करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी, गेल्या काही काळापासून अंतिम ११ मध्ये उमेशला संधी मिळालेली नाही. पहिल्या कसोटीनंतर दुखापतग्रस्त झालेल्या शार्दुल ठाकुर ऐवजी संघात ईशांत शर्माला स्थान देण्यात आले. यामुळे उमेशचे कसोटी क्रिकेटमधील कारकीर्द संपल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
उमेशने गेल्या काही काळापासून मर्यादित षटकांचे सामने देखील खेळलेले नाही. उमेशने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने ॲडीलेडच्या मैदानात ३ आणि मेलबर्नच्या मैदानात १ विकेट घेतल्या होत्या.
त्यानंतर दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी परतावे लागले होते. त्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात देखील न्यूझीलंड विरुद्ध त्याला खेळण्यासाठी संधी मिळाली नव्हती. तसेच सध्याच्या इंग्लंड दौऱ्यातही भारतीय संघात असूनही त्याला अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.
उमेशने त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना २०१८ साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता. तसेच २०१९ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने त्याचा शेवटचा टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर उमेशला मर्यादित षटकांच्या सामन्यात भारताकडून खेळण्यासाठी संधी मिळालेली नाही.
उमेशने आतापर्यंत ३३.६३ सरासरीने ७५ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण १०६ विकेट घेतल्या आहेत. तर ७ टी-२० सामन्यांमध्ये २४.३३ च्या सरासरीने ९ विकेट घेतल्या आहेत. सध्या भारतीय संघातील युवा खेळाडूंचे प्रदर्शन पाहता उमेशची भारतीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.
उमेशला भारतीय संघात खेळण्यासाठी मुख्य अडचण बनत आहे ते म्हणजे युवा गोलंदाज. सध्या भारतीय संघात उत्कृष्ट असे युवा गोलंदाज आहेत. ज्यामुळे भारतीय संघाचे व्यवस्थापक आणि कर्णधार विराट कोहली उमेश ऐवजी युवा गोलंदाजांना संघात स्थान देत आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज यांसारख्या गोलंदाजांचा समावेश आहे. त्याचबरोबर पर्यायी खेळाडू म्हणून नवदीप सैनी, दीपक चाहर आणि टी नटराजन यांसारखे खेळाडू देखील भारतीय संघाकडे आहेत.
दरम्यान, इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगली सुरुवात करून ३६४ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने पहिल्या डावात ३९१ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून जो रुटने १८० धावांची नाबाद खेळी केली.
महत्वाच्या बातम्या –
–‘हे’ ३ खेळाडू घेऊ शकतात रहाणेची जागा; भारताच्या कसोटी संघाचे मिळू शकते उपकर्णधारपद
–मैदानाबाहेरील कला! जेमिमाह रॉड्रिग्सने गिटारवर ‘दिल चाहता हैं’ चे प्रसिद्ध गाणे केले सादर; पाहा व्हिडिओ
–भारताविरुद्ध सामना म्हटलं की रुटची जबरदस्त कामगिरी ठरलेलीच! आकडे पाहून बसेल विश्वास