भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात दोन्ही संघांनी चांगले प्रदर्शन केले, पण तरीही शेवटी सामन्याचा जय किंवा पराजय असा निकाल लागू शकला शकला नाही. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडचे तळातील फलंदाज शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिले आणि सामना अनिर्णीत केला. या सामन्यात भारतीय संघाकडे विजयासाठी पूर्णपणे अनूकुल परिस्थिती होती, पण शेवटच्या एका विकेटच्या अडथळ्यामुळे भारताच्या हातातील विजय निसटला.
सामन्यादरम्यान भारतीय संघाकडून काही महत्वाच्या चूका झाल्याचे पाहिले गेले. जर संघाने या चूका केल्या नसत्या तर निकाल नक्कीच वेगळा असता. आपण या लेखात भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात केलेल्या तीन महत्वाच्या चूकांविषयी माहिती घेणार आहोत. जर या चूका भारताने केल्या नसत्या, तर भारतीय संघाची जिंकण्याची पूर्ण शक्यता होती.
भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात केलेल्या तीन महत्वाच्या चूका
१. चौथ्या दिवशी डाव घोषित करण्यासाठी संघाने उशीर केला-
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्यापासून आघाडीवर होता. सामन्याच्या चौथ्या दिवशी जेव्हा यष्टीरक्षक रिद्धिमान साहा आणि अक्षर पटेल फलंदाजी करत होते, तेव्हा देखील संघाकडे चांगली आघाडी होती. असे असले तरी, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने लवकर डाव घोषित केला नाही. समालोचक देखील याबाबत चर्चा करत होते, पण भारताने डाव घोषित करण्यासाठी उशीर केला.
रिद्धिमान साहा आणि अक्षर पटेल फलंदाजी करत राहिले आणि त्यानंतर धावसंख्या २३४ असताना संघाने डाव घोषित केला. त्यानंतर न्यूझीलंड संघाला खेळण्याची संधी मिळाली. पण चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांना फक्त चार षटकांचा सामना करता आला. या चार षटकात भारताने एक विकेट घेतला. पण जर न्यूझीलंडला फलंदाजीची जास्त संधी मिळाली असती, तर भारतीय गोलंदाजांनी अधिक विकेट्स घोण्याची शक्यता होती आणि शेवटच्या दिवशी गोलंदाजांवरचा दबाव कमी झाला असता. भारतीय संघाचा हा निर्णय एक मोठी चूक ठरला.
२. गोलंदाज शेवटच्या दिवशी विकेट्स मिळवल्यानंतर दबाव निर्माण करू शकले नाहीत-
भारतीय संघासमोर विजय मिळवण्यासाठी शेवटच्या दिवशी ९ विकेट्स घेण्याचे लक्ष्य होते. मात्र, भारतीय गोलंदाज हे लक्ष्य पूर्ण करू शकले नाहीत. भारताला चौथ्या दिवशी एक विकेट मिळाला होता. त्यानंतर पाचव्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ३ आणि तिसऱ्या सत्रात ५ विकेट मिळाले.
भारतीय संघाच्या गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले, यात कसलीच शंका नाही. पण गोलंदाज या प्रदर्शनानंतर देखील विरोधी संघावर दबाव बनवू शकले नाही. याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचे तळातील फलंदाज रचिन रवींद्र आण एजाज पटेल खेळपट्टीवर शेवटपर्यंत टिकून राहिले आणि सामना अनिर्णीत केला.
३. गोलंदाजांना शेवटच्या ५२ चेंडूत एक विकेट घेता आला नाही-
या सामन्यात भारतीय संघ सहज विजय मिळवेल अशी शक्यता होती, पण न्यूझीलंडने ती पूर्णपणे चुकीची ठरवली. भारत विजयापासून फक्त एका विकेटच्या अंतरावर होता. पण न्यूझीलंडने ही एक विकेट शेवटपर्यंत गमावली नाही. न्यूझीलंडचे ८ आणि ११ व्या क्रमांकाचे फलंदाज, रचिन रवींद्र (१९) आणि एजाज पटेल (२) शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहीले. या दोघांनी एकून ५२ चेंडूंचा सामना केला आणि यादरम्यान स्वतःची विकेट वाचवून ठेवली. यादरम्यान त्यांनी जास्त धावा केल्या नाहीत, पण ज्याप्रकारचा संयम दाखवून सामना अनिर्णीत ठेवला ते कौतुकास्पद आहे.
भारतीय गोलंदाजांनी या गोष्टीवर विचार करण्याची आवश्यकता आहे की, शेवटच्या ५२ चेंडूत संघाला गरज असताता, ते एकही विकेट घेऊ शकले नाहीत. भारताला या सामन्यात विजय न मिळवता येण्यामागे गोलंदाजांचे हे अपयश खूप मोठे कारण आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ‘या’ ३ खेळाडूंनी भारतीय संघात ठोकलीय दावेदारी, एकाने केलीत ९ शतके
शेवटच्या आर्ध्या तासात पंचांनी सतत सूर्यप्रकाशाचा आढावा घेणे योग्य होते का? रहाणेने दिले ‘हे’ उत्तर