रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघने टी-२० मालिकेत श्रीलंकेला धूळ चारली आहे. टी-२० मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) खेळला गेला आणि भारताने यामध्ये ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. रोहित आता जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जास्त टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू बनला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि पाकिस्तानी दिग्गज शोएब मलिक यांनी प्रत्येकी १२४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. आता रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. पाकिस्तानचा मोहम्मद हाफिज या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने कारकिर्दीत ११९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इंग्लंडचा ओएन मॉर्गन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत ११५ सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले.
सचिनप्रमाणेच टी२०मध्ये रोहितचा विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महान फलंदाज सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने सर्वात जास्त कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत. पण टी-२० मध्ये हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. सचिनने भारतीय संघासाठी सर्वाधिक २०० कसोटी, तर ४६३ एकदिवसीय सामन्यामध्ये प्रतिनिधित्व केले. तर रोहित शर्माने भारतासाठी सर्वाधिक १२५ टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
त्याचबरोबर कसोटी आणि एकदिवसीयमध्ये सचिनने भारतासाठी अनुक्रमे सर्वात जास्त १५९२१ आणि १८४२६ केल्या. तर टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. रोहित शर्माने टी-२० मध्ये ३३०८ धावा केल्या आहेत.
दरम्यान, या अप्रतिम आकड्यांकडे पाहता रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या या टी-२० मालिकेत मात्र निराशाजनक प्रदर्शन केले. पहिल्या सामन्यात त्याने ४४ धावा केल्या, पण पुढच्या दोन सामन्यामध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला. दुसऱ्या टी-२० सामन्यात रोहितने १, तर तिसऱ्या सामन्यात ५ धावा केल्या. असे असले तरी, भारताचे युवा खेळाडू श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजासारख्या अनुभवी अष्टपैलूच्या जोराव संघाने मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप (३-०) दिला.
महत्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्जला मिळाला नवा कर्णधार! धवन नाही, तर ‘या’ खेळाडूला मिळाली नेतृत्त्वाची जबाबदारी
टी२० सामन्यातून बाहेर असूनही युजवेंद्र चहल चर्चेत, करामतही केलीये तशीच, पाहा व्हिडिओ
रणजी ट्रॉफी: ‘या’ सामन्यात झाल्या तब्बल १३६७ धावा, पण निकाल अनिर्णितच