भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 21 फेब्रुवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 ते 25 फेब्रुवारीदरम्यान वेलिंग्टन येथे पार पडणार आहे. या सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात सलामीला पृथ्वी शॉला आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माला संधी देणार असल्याचे संकेत विराट कोहलीने दिले आहेत.
त्याचबरोबर यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमान साहाला संधी मिळू शकते, तर 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अष्टपैलू हनुमा विहारी खेळू शकतो. तसेच भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरेल, यात इशांतसह मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश असेल.
इशांत मागील काही दिवस घोट्याच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. त्याला रणजी ट्रॉफीदरम्यान ही दुखापत झाली होती. पण आता तो या दुखापतीतून सावरला असून त्याने फिटनेस टेस्टही पार केली आहे.
त्याच्याबद्दल पहिल्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना विराट म्हणाला, ‘इशांत आता ठिक वाटत आहे. तसेच घोट्याच्या दुखापतीआधी तो जसा गोलंदाजी करत होता, तशीच आत्ताही करत आहे. तो योग्य जागेवर चेंडूही टाकायला लागला आहे. तो याआधीही न्यूझीलंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याचा अनुभव आमच्यासाठी महत्त्वाचा असेल. त्याला पुन्हा एकदा वेगात आणि योग्य जागेवर गोलंदाजी करताना पाहून चांगले वाटत आहे.’
त्याचबरोबर जवळ जवळ दीडवर्षांनंतर पुन्हा भारताच्या कसोटी संघाकडून खेळण्यास सज्ज असलेल्या शॉबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘शॉ हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्याची स्वत:ची खेळण्याची एक शैली आहे. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की, तो ज्याप्रकारे खेळतो तसेच त्याने नेहमी खेळावे. या खेळाडूंवर कोणत्याही प्रकारे चांगली कामगिरी करण्यासाठी दबाव नाही. ‘
त्याचबरोबर विराटने म्हटले आहे मयंक अगरवालने जशी पदार्पणावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती, त्यातून शॉने शिकले पाहिजे.
विराट म्हणाला, ‘परदेशात चांगले खेळण्याबद्दल त्यांना चिंता नाही. ऑस्ट्रेलियामध्ये मयंकने ज्या प्रकारे कामगिरी केली त्याच प्रकारे न्यूझीलंडमध्येही पृथ्वी कामगिरी करू शकतो.’
तसेच विराट म्हणाला, ‘काही खेळाडू निर्भयपणे खेळत राहिल्यास संपूर्ण संघाचे मनोबल वाढते, यामुळे संघाला चांगली सुरूवात मिळते आणि विरोधकांविरुद्धची भीती कमी होते.’
तसेच जर शॉला पहिल्या कसोटी सामन्यात 11 जणांच्या संघात संधी मिळाली तर तो मयंक अगरवालबरोबर सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो.
या दोघांबद्दल विराट म्हणाला, ‘मला असे वाटते की, सध्या शॉमध्ये अनुभवाची कमतरता आहे. मी मयंकला अनुभवहीन म्हणणार नाही. कारण, त्याने मागील वर्षी खूप धावा केल्या होत्या. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा खेळ कसा आहे, हे आम्हाला माहिती आहे.’
विराटचे टेंशन वाढले! न्यूझीलंडच्या या गोलंजाने दिली आऊट करण्याची चेतावणी
वाचा????https://t.co/RWWQtwd0Yj????#म #मराठी #Cricket #INDvsNZ #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 19, 2020
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर; सचिन, सेहवागसह युवराज, झहीरचाही समावेश
वाचा- ????https://t.co/SYo95rsO7h????#म #मराठी #Cricket @sachin_rt @virendersehwag @YUVSTRONG12 @ImZaheer— Maha Sports (@Maha_Sports) February 19, 2020