नुकताच इंडियन प्रीमियप लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम पूर्ण झाला आहे. यंदाच्या हंगामात नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. गुजरातसह आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने तब्बल १४ वर्षांनी अंतिम सामन्यात धडक मारली होती. दिवंगत शेन वॉर्ननंतर राजस्थानला अंतिम सामन्यात पोहोचवणारा संजू सॅसमन हा दुसरा कर्णधार ठरला आहे. त्यामुळे आयपीलच्या अंतिम सामन्यात पराभव मिळाला असला, तरी संजू सॅमसनकडे असलेली नेतृत्वशैली कमी होत नाही, असे विधान भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने केले आहे.
क्रिकबझशी संवाद साधताना भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचे (Sanju Samson) गोडवे गायले. सेहवाग म्हणाला की, “संजू अंतिम सामना हरला असेल, पण याचा अर्थ त्याच्या कर्णधारपदाला कमी लेखले जावे असे नाही. अंतिम फेरीत त्याच्याकडे अतिरिक्त गोलंदाज नव्हता, त्यामुळे त्याला पराभवाला सामोरे जावे लागले.”
सेहवाग म्हणाला की, “कदाचित संजूने न्यूझीलंडच्या जिमी नीशमला त्याच्या संघात घेतले असते, तर या खेळपट्टीवर अतिरिक्त वेग निर्माण करून विशेष कामगिरी करू शकला असता. मात्र, त्याच्याकडे गोलंदाजीत जी काही संसाधने होती, ती त्याने संपूर्ण स्पर्धेत योग्य प्रकारे वापरली. गेल्या दोन हंगामाच्या तुलनेत या हंगामात त्याने चांगले कर्णधारपद भूषवलेले.”
“संजूने मला त्याच्या नेतृत्वाने खूप आश्चर्यचकित केले. संजूच्या जागी मी स्वत:ला बसवतो आणि विचार करतो की, जर मी कर्णधार असतो, तर मी काय केले असते, गोलंदाजीत काय बदल केले असते. त्यावेळी संजूने ९० टक्के वेळेस तेच काम केले, जे मी केले असते,” असं म्हणत संजूच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
दरम्यान, आयपीएल २०२२च्या संपूर्ण हंगामात संजू सॅमसनने केवळ नेतृत्वातच नाही, तर फलंदाजीमध्ये देखील आपली चमक दाखवली आहे. संजूने आयपीएल २०२२मध्ये १७ सामन्यांत ४५८ धावा काढल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता. संजूने यंदाच्या हंगामात १४६.७९च्या स्ट्राईक रेटने ४३ चौकार आणि ३६ षटकार देखील लगावले. त्यामुळे संजूच्या फलंदाजीचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! सौरव गांगुलीने सोडले बीसीसीआयचे अध्यक्षपद? ट्विटरवरून दिले संकेत